गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा- वारी (हनुमान) निसर्गसौंदर्याने नटलेले शिवकालीन धार्मिक पर्यटनस्थळ. आज हे स्थळ चर्चेत आले तरुण पर्यटकांचे बुडून होणाऱ्या मृत्यूमुळे. मंदिरानजीक असलेल्या आड व वान नदीमधील मामा-भाच्या व राजन्या डोहमधील निळेशार पाणी पाहिल्यानंतर पर्यटकांना पोहण्याचा मोह आवरत नाही. मात्र या डोहमधील अंतर्गत रचनेचा अभ्यास नसल्यामुळे या डोहाच्या कपारीत अडकून मृत्यू पावणाऱ्या पर्यटकांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. गेल्या तीस वर्षात 200 च्या वर पर्यटक बुडल्याच्या नोंदी हिवरखेड व संग्रामपूर पोलीस स्टेशनच्या अभिलेखमध्ये आहेत विशेष म्हणजे बुडून मरण पावणारे पर्यटक पंचवीशीच्या आतील आहेत हे विशेष. गेल्या चार वर्षांपासून युवाशक्ती संघटना संचालित, निसर्ग व पर्यावरण क्षेत्रात कार्यरत वान फाउंडेशनने या डोहमध्ये उपाययोजना व्हाव्यात म्हणून सातत्याने पाठपुरवठा केला. तत्कालीन पालकमंत्री डॉ. रणजित पाटील व जिल्हाधिकारी यांनी या डोहाची पाहणी सुद्धा केली होती. सततच्या पाठपुराव्यामुळे शासनाने जिल्हाधिकारी अकोला यांच्या अध्यक्षतेखाली मामा-भाचा डोह उपाययोजना समिती सुद्धा स्थापन झाली. नाविन्यपूर्ण योजनेमधून या उपाययोजना करण्याचे सुद्धा ठरले होते. पाटबंधारेच्या यांत्रिकी विभागाकडून 76 लाख रुपये किंमतीचे अंदाजपत्रक सुद्धा जिल्हाधिकारी यांच्या कडे सादर झाले. या अंदाजपत्रकामधील त्रुटी दूर करून उपाययोजना दीर्घ मुदतीच्या व्हाव्यात ही वान फाउंडेशन ची सूचना मान्य करून सुधारित अंदाजपत्रक सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले होते. पाटबंधारे विभागातील अंतर्गत वादात असंवेदनशील असलेल्या अधिकाऱ्यांनी वेळेच्या आत अंदाजपत्रक सादर केले नाही.पुढे आचारसंहिता निवडणुका व शासन बदलल्यामुळे उपाययोजनांची कार्यवाही खोळंबली. मागील ऑगस्ट महिन्यात पाच पर्यटकांचा बुडून मृत्यू झाल्याने उपाययोजनांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या संदर्भात उपाययोजनांचा सुधारित प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे नव्याने सादर करण्याची मागणी वान फाउंडेशन चे उत्तम नळकांडे यांनी उपविभागीय अधिकारी अकोट यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. उपाययोजनांच्या कार्यवाहीत खूपच दिरंगाई झाली असल्यामुळे प्रशासनाला अजून किती तरुणांचे बळी हवे आहेत. असा संतप्त सवाल वान फाउंडेशनने केला आहे.


