संतोष पोटपिल्लेवार
तालुका प्रतिनिधी, घाटंजी
घाटंजी:- शासनाच्या महत्वाकांक्षी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (डी.बी.टी.) प्रणालीच्या गोंधळामुळे तालुक्यातील बरेच निराधार नागरिक अडचणीत सापडले आहेत. दिव्यांग, निराधार,वृद्ध आणि विधवा महिलांना मागील तीन ते चार महिन्यांपासून त्यांच्या हक्काचे अनुदान मिळालेले नाही. यामुळे या लाभार्थ्यांवर औषधोपचार,भोजन आणि दैनंदिन गरजा भागवण्याचे मोठे संकट ओढवले आहे.तहसील कार्यालये आणि शासकीय बँकांच्या दारात हे निराधार नागरिक अनुदानासाठी हेलपाटे मारत आहेत.अनेकजण शारीरिक आणि मानसिक त्रासाला कंटाळले आहेत.वेळेवर अनुदान न मिळाल्याने त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे.ज्यांना नियमित औषधोपचारांची गरज आहे, त्यांची अवस्था अधिक बिकट झाली आहे.या गंभीर परिस्थितीकडे स्थानिक लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधण्याची गरज आहे. निवडणुकीच्या तोंडावर विकासकामांचे मोठे दावे करणारे नेते आता या गरीब आणि गरजू नागरिकांच्या मदतीसाठी पुढे कधी येणार, असा सवाल उपस्थित होत आहे. प्रशासनाने डी.बी.टी. प्रणालीतील त्रुटी तातडीने दूर करून लाभार्थ्यांचे रखडलेले अनुदान त्वरित त्यांच्या खात्यात जमा करावे, अशी मागणी जोर धरत आहे.एकीकडे शासन पारदर्शक कारभाराचा दावा करत आहे, तर दुसरीकडे डी.बी.टी. प्रणालीच्या अव्यवस्थेमुळे गरीब आणि असाह्य नागरिक त्यांच्या हक्काच्या पैशांपासून वंचित राहत आहेत. या गंभीर समस्येकडे जिल्हा प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन या लाभार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. अन्यथा, या दुर्बळ घटकांचे मोठे हाल होतील, यात शंका नाही.


