संतोष पोटपिल्लेवार तालुका प्रतिनिधी, घाटंजी
घाटंजी:-यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेने जाचक अटी लादून शेतकऱ्यांना थेट कर्जपुरवठा करण्याचा घेतलेला निर्णय हा शेतकऱ्यांसाठी अडचणी निर्माण करणारा आहे. त्यामुळे सदर निर्णय तत्काळ रद्द करावा व सोसायटीच्या माध्यमातून कर्जप्रक्रिया सुरू करावी, अन्यथा कुटुंबांसह आत्महत्येची परवानगी द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनातून केली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. घाटंजी तालुक्यातील घाटी-घाटंजी, शिरोली, पारवा, शिवणी, सायतखर्डा, भांबोरा व पाडी येथील शेतकऱ्यांनी ३१ मार्च २०२४ पर्यंत पीकर्जाचा भरणा हा सोसायटीमध्ये केला. नवीन कर्ज मिळण्यासाठी नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनी आपआपल्या सोसायटीमध्ये अर्ज सादर केले. सदर अर्जाची छाननी होवून साधारणतः १५ ते २० एप्रिलदरम्यान नवीन कर्ज शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होणे अपेक्षित होते. मात्र, ८ मे नंतरही शेतकऱ्यांना कर्ज मिळाले नाही. याबाबत शेतकऱ्यांनी सोसायटीला विचारणा केली असता जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून शेतकऱ्यांना थेट कर्ज पुरवठा करण्याचे धोरण आखल्याची माहिती प्राप्त झाली. अनिष्ट तफावतीचे कारण पुढे करुन सोसायटींना कर्जवाटप प्रकियेतून बाजुला करण्यात आल्याचे समोर आले. जिल्हा मध्यवर्ती बँक व सोसायटीच्या वादात नियमित कर्जफेड करणारा शेतकरी मात्र अडकला. मध्यवती बँकेने जारी केलेल्या परिपत्रकानुसार नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना मध्यवर्ती बँकेचा सभासद होणे आवश्यक आहे. त्यानंतर कर्जमागणी अर्जासोबतसादर करावयाच्या कागदपत्रासाठी जाचक अटी लादल्यामुळे शेतकऱ्यांची दमछाक होणार आहे. खरीप हंगाम तोंडावर असताना तातडीने बँकेकडून पीककर्ज उपलब्ध होण्याची शक्यता धुसर झाली आहे. अनिष्ट तफावतीचे कारण पुढे करुन तालुक्यातील घाटी घाटंजी, शिरोली, पारवा, शिवणी, सायतखर्डा, भांबोरा व पाडी अशा सात सोसायटीच्या नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना थेट कर्ज पुरवठा करण्याचा निर्णय जिल्हा मध्यवर्ती बँकेने घेतला. मात्र, हा निर्णय वेळेत न घेता शेतकऱ्यांनाअंधारात ठेवून घेतल्याने ऐनवेळी शेतकऱ्यांची धावपळ सुरू झाली. जिल्हा मध्यवर्ती बँकेने घेतलेला निर्णय तत्काळ रद्द करुन पूर्ववत सोसायटीच्या माध्यमातूनच पीककर्ज वाटप करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. या मागणीचा शासनाने व जिल्हा मध्यवर्ती बँकेने सहानुभूतीपूर्वक विचार न केल्यास कुटुंबांसहसोसायटीच्या अधिकारावर गदा आणण्याचा कुटिल डावआत्महत्या करण्याची परवानगी द्या,असे निवेदन दिले, यावेळी घाटी-घाटंजी सोसायटीचे अध्यक्ष यादवराव निकम, पारवा सोसायटीचे अध्यक्ष सचिन देशमुख पारवेकर, संजय गोडे, आशिष भोयर, सतिश मलकापुरे, विलास महल्ले, अनुप अप्पनवार, महेश ठाकरे, लियाकत तव्वर, महेश चिव्हाणे आदी उपस्थित होते.