ग्रामीण भागात बसफेऱ्या वाढवा म्हणून मागणी करण्यासाठी गेलेल्या पत्रकारा विरोधात, उमरखेड आगार प्रमुखाची पोलीस स्टेशनला तक्रार प्रकरण..
अजीज खान शहर प्रतिनिधी ढाणकी
स्व.माधवराव मिटकरे प्रवाशी मंडळ, ढाणकीचे अध्यक्ष तथा दर्पण पत्रकार संघ, ढाणकीचे उपाध्यक्ष शे. इरफान शे. गुलाब रा. ढाणकी यांच्याविरुद्ध महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ उमरखेड येथील आगार प्रमुख यांनी खोटी तक्रार केली असून, खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अशी माहिती दर्पण पत्रकार संघ ढाणकी यांना कळताच,पत्रकारावर झालेल्या अन्यायाच्या विरोधात संघटनेने निवेदन संबंधित विभाग तथा शांतता सुव्यवस्था अबाधित राखणारे विभागांना रीतसर निवेदन दिले आहे. उमरखेड आगारात बसचे उत्पन्न वाढविण्यासाठी तसेच काही नवीन बस फेरी सुरू करण्यासाठी दि. २ मे २०२४ रोजी निवेदन देण्यासाठी दर्पण पत्रकार संघ ढाणकी चे उपाध्यक्ष पत्रकार शे. ईरफान ढाणकी शहरातील काही प्रतिष्ठित नागरिक सोबत घेऊन गेले होते. परंतु निवेदन देतांना किंवा नंतर कोणतीही अनुचित घटना घडली नसतांना सुध्दा, यांच्यावर खोटी तक्रार दाखल का करण्यात आली ?केवळ निवडणूक कार्यात हयगय व कसूर केल्याची बातमी वृत्तपत्रात प्रकाशित केली असल्यामुळेच खोटी तक्रार दाखल करून, खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा हा प्रयत्न तर नाही न? बसचे उत्पन्न वाढवण्यासाठी सहकार्य करणे, बस वेळेवर सुटली किंवा सुटणार की नाही याबाबत विचारणा करणे हा अपराध नसून, केवळ सामाजिक कार्य आहे. केवळ बातमी चा वचपा काढण्यासाठी पत्रकार शे. इरफान व त्यांच्यासोबत गेलेले सहकारी यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा हा प्रयत्न असून, चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांची दमदाटी करण्याचा हा प्रयत्न आहे. तरी सदर प्रकरणाची गांभीर्याने चौकशी व्हावी. कुणावरही अन्याय न व्हावा. मेहरबान साहेबांनी खोटी तक्रार मागे घ्यावी. तसेच कर्तव्यात कसूर केलेल्या व खोटी तक्रार केलेल्या कर्मचारी व संबंधीतांवर कारवाई करावी. अशा आशयाचे निवेदन दर्पण पत्रकार संघ ढाणकी शहर तर्फे पोलीस उपविभागीय अधिकारी उमरखेड, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तथा परिवहन मंत्री महाराष्ट्र राज्य,श्रीकांत साहेब उपमहाव्यवस्थापक नियंत्रण समिती ३ नागपूर,अमोल गोंजारी विभाग नियंत्रक रा.प.म. यवतमाळ,नामदेव ससाने आमदार उमरखेड महागाव विधानसभा,पोलीस अधीक्षक यवतमाळ,ठाणेदार उमरखेड यांना देण्यात आले. याप्रसंगी दर्पण पत्रकार संघटनेचे सर्व पत्रकार बांधव तथा उमरखेड व ढाणकी परिसरातील ज्येष्ठ श्रेष्ठ पत्रकार बंधू उपस्थित होते. चौकट जनहितार्थ मागणी करिता गेलेल्या पत्रकारावर जर असे खोटे गुन्हे दाखल होत असतील तर, सामान्य नागरिकांचे काय ? त्यांनी न्याय मागण्यासाठी कुणाकडे जावं ? हा प्रश्न उपस्थित होत असून, शासन- प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घ्यावी व जिल्ह्यातील सर्व पत्रकार बांधवांनी सुद्धा ही बाब गांभीर्याने घ्यावी. असे मी आवाहन करतो.शे. ईरफान शे. गुलाब दै.भास्कर प्रतिनीधी