मुकेश मेश्राम
जिल्हा प्रतिनिधी भंडारा
भंडारा : काँग्रेसचे ओबीसी प्रेम हे बेगडी आहे. ओबीसींना न्याय देण्याच्या दृष्टीने त्यांच्याकडून कोणतेही सकारात्मक प्रयत्न झाले नाही मात्र आज केंद्र आणि राज्य सरकार ओबीसी कल्याणाचे काम करीत असताना हे लोक केवळ संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप भाजपाचे ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष संजय गाते यांनी केला आहे. ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून जबाबदारी आल्यानंतर संजय गाते पहिल्यांदा भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी आयोजित कार्यक्रमात बोलत होते. ओबीसी मोर्चाचे प्रभारी माजी आमदार आशिष देशमुख उपस्थित होते. ओबीसी कल्याणाचे अनेक निर्णय गैर कॉंग्रेस ही सरकारच्या काळात म्हणजे भाजपच्या काळात झाले. पहिल्यांदाच ओबीसी समाजातून प्रधानमंत्री म्हणून प्रतिनिधित्व करण्याची संधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाली. केंद्र सरकारचे अनेक निर्णय आणि योजना ओबीसी समाजाच्या उत्कर्षाला आणि कल्याणाला पोषक अशाच असल्याचे गाते यांनी सांगितले. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना ओबीसींकरिता स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना झाली. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या माध्यमातून उच्च शिक्षण घेता यावे म्हणून महाज्योती सारख्या संस्थेची सुरुवात करण्यात आली. अनेक विद्यार्थी घडत असल्याचे ते म्हणाले. वैद्यकीय आणि इतर अनेक संस्थांमध्ये ओबीसींना आरक्षण नव्हते. हे आरक्षण मिळवून देण्याचे कार्य भाजपच्या काळात झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अस्तित्वात आणलेल्या अनेक लोक हिताच्या योजनांचा लाभ घेणारे 40 ते 50 टक्के लाभार्थी हे ओबीसी असल्याचे त्यांनी सांगितले. ओबीसींचे राजकीय आरक्षण जाण्यामागे ओबीसींचा कैवारी असल्याचा आव आणणारे काँग्रेस नेते नाना पटोले यांचा महत्वाचा वाटा आहे. त्यांच्याच एक जिल्हा परिषद अध्यक्षाने न्यायालयात याचिका टाकली आणि हा वाद पेटला. खर तर काँग्रसचे ओबीसी प्रेम हे दिखावा आणि बेगडी असून ते केवळ ओबीसींच्या नावाखाली जनतेत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोपही गाते यांनी केला. आगामी काळात येणाऱ्या निवडणुकांमध्ये काँग्रेसचे हे सोंग उघडे पाडण्यासाठी मोर्चा गावागावात जाऊन केंद्र आणि राज्य सरकारच्या ओबीसी कल्याणाच्या विविध योजनांचा पाढा वाचेल असेही ते म्हणाले. कार्यक्रमाला भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश बाळबूधे, ओबीसी प्रदेश सचिव डि.डि. सोनटक्के, जिल्हा प्रभारी चामेश्वर गहाणे, पुर्व विदर्भ संघटक रवींद्र चव्हाण, प्रदीप पडोळे, अनुप ढोके, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष महेंद्र निंबार्ते, जिल्हा महामंत्री हेमंत देशमुख, प्रशांत खोब्रागडे, तालुका अध्यक्ष विनोद बांते, मोहन सुरकर, शहराध्यक्ष संजय कुंभलकर, निळकंठ कायते, रामदास शहारे, नितीन कडव, सौ. मंजिरीताई पनवेलकर, यश ठाकरे, भगवान चांदेवार, मयुर बिसेन, अजय ब्राम्हणकर यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
चौकट:
नानागिरी संपली ओबीसींचे कैवारी असल्याचे सांगणाऱ्या नाना पटोले यांच्या संदर्भात पत्रकार परिषदेत विचारले असता माजी आमदार आशिष देशमुख यांनी नानागिरी संपली असल्याचे सांगितले. नाना पटोले हे जमिनीवरचे नेते राहिले नाही. ते एकटेच राहून ओबीसींचा नेतृत्व करीत आहेत, असा टोला माजी आमदार आशिष देशमुख यांनी यावेळी लावला.