मुंबई : दिवसेंदिवस ढासळत असणाऱ्या हवेची गुणवत्ता वाढवण्यासाठी राष्ट्रीय हरित प्राधिकरणाच्या निर्देशानुसार मुंबई महानगरपालिकेने आता यांत्रिकी झाडू खरेदीवर भर दिला आहे. शहर आणि उपनगरांतील रस्त्यांची स्वच्छता करण्यासाठी लवकरच आणखी नऊ यांत्रिकी झाडू खरेदी करण्यात येणार आहेत. यासाठी १५ व्या वित्त आयोगाने मुंबई महानगरपालिकेला निधी दिला आहे. गेल्या काही वर्षांपासून मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावू लागली आहे. राष्ट्रीय हरित प्राधिकरणाने त्याची दखल घेतली आहे. हवेच्या गुणवत्तेचे प्रमाण ओटोक्यात ठेवण्याकरीता यांत्रिकी झाडू खरेदी करण्यासाठी १५ व्या वित्त आयोगाने मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा विभागाला निधी उपलब्ध केला आहे. त्यातून शहर व पूर्व उपनगरांसाठी चार व पश्चिम उपनगरासाठी पाच ई-यांत्रिकी झाडू खरेदी करण्यात येणार आहेत. मुंबई महानगरपालिकेने यासाठी निविदा मागवल्या होत्या. निविदा प्रक्रियेअंती कंत्राटदार निश्चित करण्यात आले असून त्याबाबतचा प्रस्ताव आयुक्तांच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. वाहनारुढ नऊ झाडूंची खरेदी आणि चार वर्षे देखभाल व प्रचालन या कामासाठी ४२ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.
पश्चिम उपनगरांतील पाच झाडूंसाठी २३ कोटी २० लाख रुपये आणि अन्य चार झाडूंसाठी १९ कोटी २२ लाख रुपये खर्च येणार आहे. वातावरणातील बदल आणि सर्वत्र सुरू असलेल्या विविध विकासकामांमुळे निर्माण होणाऱ्या धुळीने हवेचा गुणवत्ता स्तर खालावला आहे. रस्त्यांवरील कचरा व धूळ साफ करण्यासाठी महानगरपालिकेतर्फे जुन्या पद्धतीनुसार लांब झाडू व मनुष्यबळाचा वापर करण्यात येतो. मात्र या पद्धतीने साफसफाई करताना वातावरणात धूळ उडते. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून यांत्रिकी झाडूचा विचार पुढे येऊ लागला आहे. सध्या महानगरपालिकेकडे २७ यांत्रिकी झाडू आहेत. त्याद्वारे दररोज सुमारे २९३ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची स्वच्छता करण्यात येत आहे. याच धर्तीवर आणखी ९ झाडू खरेदी करण्यात येणार आहेत. प्रत्येक इलेक्ट्रिक झाडूद्वारे दररोज किमान ७.५ किमी लांबीच्या रस्त्याची सफाई करता येणार आहे. केवळ रस्त्याच नव्हे तर पदपथ आणि दुभाजकाचीही यांत्रिकी झाडूने सफाई करण्यात येणार आहे. रस्त्याचे चार फेरे याप्रमाणे एका वाहनाद्वारे ३० किमी इतके अंतर साफ केले जाणार आहे. ही यांत्रिकी झाडू वाहने विभाग कार्यालयांतील घनकचरा व्यवस्थापन खात्याकडे सोपविण्यात येणार आहेत. या वाहनांनी एकत्र केलेला कचरा डेब्रीज वाहून नेणाऱ्या वाहनांमधून कचराभूमीत नेण्यात येणार आहे. ही वाहने दोन पाळ्यांत चालविण्यात येणार असून प्रत्येक पाळीत चार तास काम करण्यात येणार आहे. रात्रीच्या पाळीत एका दिवसात आठ तासाचे काम करतील. या यंत्राचा जास्तीत जास्त वापर करण्याच्यादृष्टीने घनकचरा विभागाला नियोजन करावे लागणार आहे.


