सय्यद रहिम रजा
ग्रामीण प्रतिनिधी, उमरखेड
उमरखेड : या वर्षी तालुक्यात कपाशी, सोयाबीन सोबतच तुरीचीही लागवड करण्यात आली. सध्या तुर बहरली व शेगां लागल्या आहेत परंतु मागील दोन तीन दिवसापासून वातावरण ढगाळ असल्याने याचा परिणाम थेट तूरीच्या पिकांवर झाला आहे. तुर पिकावर किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याने उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी आर्थिक संकटात सापडण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. सततच्या नापिकीमुळे त्रासलेल्या शेतक-यावर नेहमीच संकटाची टांगली तलवार असतेच. वातावरणात होणारा बदल जर कोणाला जाणवत असेल तर तो सर्वात आधी शेतातील पिकावर जाणवायला लागतो. अशीच परिस्थिती आज तूरीच्या उभ्या पिकावर येऊन ठाकली आहे. ढगाळ वातावरणामुळे फुल गळती व किडाचे वाढते प्रमाण वर्तविण्यात येत असुन, त्याचा थेट परिणाम उत्पादनावर होणार आहे. याचा मोठा फटका शेतकऱ्याला बसणार असल्याचे दिसत असुन त्यामुळे मात्र उभे पीक पुन्हा हातून जाणार ही भिती शेतकऱ्यांना सतावत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर नैराश्य दिसायला लागले आहे. अशा वातावरणामुळे निर्माण झालेली कीड सुद्धा मोठा प्रश्न आहे. तर फुल गळती व कीड ढगाळ वातावरणामुळे होत असल्याने यावर कोणताही उपाय करता येत नसल्याने या समस्येला सामोरे जायचे तरी कसे? पीक कसे वाचवाचे याकरिता जगाच्या पोशिंद्याची धावपळ सुरू आहे. आधीच उमरखेडतालुक्यात अतिवृष्टीत शेतकरी पुर्णतः आर्थिक पेचकडीत पडल्या गत झाला आहे.एकुणच तालुक्यात दुष्काळी परिस्थिती आणि त्यात ढगाळ वातावरणामुळे हाती येणाऱ्या पिकापासून मुकावे लागते की काय, अशा परिस्थितीत आज शेतकरी सापडला आहे. उमरखेड तालुक्यात हजारो हेक्टर कृषी क्षेत्र असून त्यात कपाशी, सोयाबीन व तुरीचे उत्पादन घेतले जाते. परंतु ढगाळ वातावरणाने विपरीत परीणाम होणार असल्याचे शेतकऱ्यांमधुन बोलल्या जात आहे. त्यामुळे उमरखेड तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला असुन संकटाची मालीका शेतकऱ्यांची पाठ सोडत नसल्याने कपाशी, सोयाबीन, व आता तुर हातची जाणार त्यामुळे परत एकदा आर्थिक फटका बसणार असल्याची शेतकऱ्यांमध्ये धास्ती भरली आहे.


