पुणे : पुणे मुंबई दरम्यानच्या जुन्या आणि नव्या महामार्गावरील वाढते अपघात रोखण्यासाठी आरटीओ अधिकारी आता 24 तास या मार्गावर गस्त घालणार आहेत, ही गस्त कशी असणार, किती अधिकारी 24 तास येथे कार्यरत असणार, कोण कोणत्या कार्यालयातील पथके कार्यरत असणार, या संदर्भातील आराखडा म्हणजेच ॲक्शन प्लॅन तयार करण्यात आला आहे. त्यामुळे आता जुन्या आणि नव्या महामार्गावर होणारे अपघात काही प्रमाणात रोखण्यास प्रशासनाला यश येणार आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग तसेच जुन्या महामार्गावर वाहतुक नियमांचा भंग वाहन चालकांकडून मोठ्या प्रमाणावर करण्यात येत आहे. त्यामुळे अपघात वाढत आहेत. यामध्ये वाहन चालक अतिवेगाने वाहन चालविणे, विना हेलमेट, विना सिटबेल्ट आणि चुकीच्या मार्गिकेमध्ये वाहन चालविणे, चुकीच्या पध्दतीने मार्गिका बदलणे यांसारखे नियम भंग करतात. वाहन चालकांना शिस्त लागून अपघात कमी करण्याच्या दृष्टीने हा ॲक्शन प्लॅन तयार करण्यात आला आहे. मागच्या आठवड्यात परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांनी यासंदर्भातील आदेश राज्यातील सर्व आरटीओ कार्यालयांना दिला होता. पुणे आणि पनवेल आरटीओला नोडल कार्यालय म्हणून जबाबदारी देण्यात आली होती, असे पुण्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. अजित शिंदे यांनी मागच्या आठवड्यात पत्रकार परिषदेत दिली होती. त्यानुसार आता हा ॲक्शन प्लॅन तयार झाला आहे.