अहमदनगर : दिल्ली येथे दीड हजार किलोमीटरच्या सायकल राईडसाठी निघालेल्या नगर येथील सायकलपट्टूचा कंटेनरने धडक दिल्याने अपघात झाला. रात्रीच्या वेळी झालेल्या या अपघातात सायकल पटू जस्मितसिंह वधवा थोडक्यात बचावले. सायकल पटू चस्मित सिंह यांचे बंधू हरजीत सिंह वधवा म्हणाले, ऑडेक्स या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या मार्गदर्शनाखाली दिल्ली रेंडोनिअर्स ग्रुपच्यावतीने पाच दिवसाच्या एसआरसाठी वधवा दोन आठवड्यापूर्वीच नगर येथून दिल्लीला रवाना झाले होते. तेथे दीड हजार किलोमीटर सायकलिंग करण्याचा मानस होता. एस.आर. म्हणजे सुपर रायडिंग ज्या मध्ये दिवस रात्र सायकल चालवावी लागते. 24 तासात दोन ते चार तास आराम मिळतो. पाहिल्या दिवशी 400 किमीच्या राईडला जाताना जस्मितची सायकल नादुरुस्त झाली. सायकल दुरुस्त करून पुन्हा तिसरऱ्या दिवशी 500 किमीसाठी सायकल चालवत असताना फरिदाबाद पलवल येथील टोल नाक्याजवळ अचानक मागून येऊन त्याला कंटेनरने जोरदार धडक दिली. यामध्ये चालक धडक देऊन पळून गेला. हा प्रकार रात्री 1 च्या सुमारास घडला. त्याठिकाणी त्यांच्या सोबत असलेले दुसऱ्या सायकल स्वाराने आयोजक चिरो मित्रा यांना फोन करुन तात्काळ त्या ठिकाणी पाचारण केले. जस्मित रस्त्याच्या कडेला बेशुद्ध अवस्थेत होता.
नशिबाने साथ दिल्याने रुग्णवाहिका पाच मिनिटातच उपलब्ध झाली आणि जस्मितला दहा मिनिटात पलवल येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. सकाळी ५ वाजेपर्यंत तो बेशुद्ध अवस्थेत एकटाच हॉस्पिटलमध्ये होता. त्याच्याबरोबर असलेल्या सायकपटूंनी त्याच्या उपचाराच्या सर्व पूर्तता करुन व त्याच्या नातेवाईकांना कळवून पुढील राइडसाठी निघून गेले. जस्मितशी त्याच्या कुटुंबीयांनी संपर्क साधला, त्यावेळेस त्याला काय घडलं ते आठवतच नव्हते. ज्यावेळी राईड संपल्यावर त्याच्याबरोबर असलेल्या सायकलपटूंनी घडलेला प्रकार सांगितल्याने हकीकत समोर आली. या अपघातात हेल्मेट तुटून सायकलचे नुकसान झाले त्याचबरोबर जस्मितला फ्रॅक्चर झाले. आता जस्मित अहमदनगरला परतला असून, त्याची प्रकृती चांगली आहे.