सुमित सोनोने
तालुका प्रतिनिधी,मूर्तिजापूर
मुर्तिजापूर :– खर्रा सेवनामुळे तरुण वयातच अनेक युवकांना दुर्धर आजाराने ग्रासले असून अनेकांना तोंडाचे विकार जडत आहेत.या व्यसनापायी अनेक तरुणांनी लग्नाआधीच आपला जीव गमावलेला आहे.तरी सुद्धा खर्रा सर्रास सुरू आहे.तंबाखूमध्ये निकोटिन नावाचा विषारी पदार्थ असून तो माणसाच्या शरीराला अत्यंत घातक आहे.सुपारी व तंबाखूच्या सेवनाने अनेक महिला पुरुषांचे संपूर्ण दात खराब झाले असून त्यांच्याकडून कडक वस्तू चावणे कठीण झाले आहे. याच ख-र्यामुळे अनेकांचे तोंड उघडत नसल्याचे सांगण्यात येत आहे. खर्रा खाल्ल्यामुळे जबड्याचा,ओठाला घशाचा कॅन्सर होण्याची संख्या झपाट्याने वाढत आहे. खर्रा तंबाखू आरोग्यासाठी हानिकारक असून त्यामुळे कॅन्सरसुद्धा होऊ शकतो. हे माहीत असतानाही या शौकिनांना स्वतःच्या आरोग्याची व कुटुंबाच्या जबाबदारीची जाणीव त्याला नसते.
आज खर्रा पानटपरीवर किंवा दुकानातच नव्हे तर, ग्रामीण भागात घरुनही सर्वत्र मिळू लागल्याने ती एक फॅशन झाली असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. यामध्ये मजुरवर्गच नव्हे तर,अधिकारी कर्मचारी,विद्यार्थी काही शिक्षक,शेतकरी, व्यापारी, महिला व बरीच लहान मुले मोठ्या ऐटीत गुटखा,पान, तंबाखू,खर्रा सेवन करतांना दिसतात.विशेषतः तरुणपिढी या व्यसनाच्या अधिक आहारी जात आहे. त्यामुळे तरुणपिढी दुर्धर आजाराने ग्रासले आहे.परिणामी अनेकांचे यामुळे जीव जात आहेत. तरी सुद्धा हल्लीची तरुणपिढी याकडे साफ दुर्लक्ष करीत असून आपले जीवघेणे व्यसन मात्र,कायम ठेवत आहे.सध्यास्थितीला मोठ्या ऐटीत खर्रा सेवन करणे तरुणपिढीची फॅशन झाली आहे.