सुधीर जाधव.
जिल्हा प्रतिनिधी, सातारा.
सातारा : दि. १७ शेतकर्यांचा दसरा, दिवाळी सण होणार गोड, अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याने गाळपास येणार्या उसाला उच्चतम दर देण्याची परंपरा कायम ठेवली असून गाळप झालेल्या उसाला एफ.आर.पी. पेक्षा जास्त दर दिला आहे. दरम्यान, गाळप झालेल्या उसाला प्रति टन १०० रुपयांचा तिसरा हप्ता ऊस पुरवठादार शेतकर्यांच्या बँक खाती जमा करण्यात आला असल्याची माहिती कारखान्याचे मार्गदर्शक संचालक आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली असून यामुळे संबंधित शेतकर्यांचा दसरा, दिवाळी सण गोड होणार आहे.
गाळपास येणार्या उसाला १० दिवसांच्या आत पेमेंट देणारा कारखाना अशी ख्याती असलेल्या अजिंक्यतारा साखर कारखान्याचा यंदाच्या हंगामासाठी प्रति टन २९४० रुपये एवढा एफ.आर.पी. दर निघाला होता. त्यानुसार गाळप झालेल्या उसाला कारखान्याने प्रति टन २८०० रुपये पहिला हप्ता आणि प्रति टन ७५ रुपये दुसरा हप्ता वेळेत अदा केला होता. दरम्यान, कारखान्याने गाळप झालेल्या उसाचा तिसरा हप्ता, प्रति टन १०० रुपये हप्ता दिला असून त्यानुसार होणारी एकूण रक्कम ७ कोटी ५ लाख रुपये संबंधित शेतकर्यांच्या बँक खाती वर्ग करण्यात आले आहे. कारखान्याने एफ.आर.पी. पेक्षा ३५ रुपये प्रति टन एवढी जास्त रक्कम शेतकर्यांना दिली असून गाळप झालेल्या उसाचे संपूर्ण पेमेंट अदा केले आहे. १०० रुपयांचा तिसरा हप्ता बँक खाती वर्ग करण्यात आला असून संबंधित शेतकर्यांनी आपल्या बँक शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन कारखाना व्यवस्थापनाने केले आहे. १०० रुपयांच्या हप्त्यामुळे ऊस पुरवठादार शेतकर्यांच्या दसरा आणि दिवाळी सणाला गोडवा आला आहे.संपन्न झालेल्या गळीत हंगामात कारखान्याने ७ लाख ५ हजार मे. टन उसाचे गाळप केले असून प्रति टन २९७५ रुपये याप्रमाणे संबंधित ऊस पुरवठादार शेतकर्यांना २०९ कोटी ७३ लाख ७५ हजार रुपये अदा केले आहेत. कारखान्याने उच्चतम दर देण्याची परंपरा अबाधित ठेवली असून आगामी होऊ घातलेल्या गळीत हंगामातही किफायतशीर दर देण्यासाठी कारखाना कटीबद्ध असल्याचे आ, शिवेंद्रसिंहराजे यांनी म्हटले आहे. नेहमीप्रमाणे आपला संपूर्ण ऊस अजिंक्यतारा कारखान्याला घालून आगामी गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन आ. शिवेंद्रसिंहराजेंनी केले आहे.


