डॉ.शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी, परभणी
परभणी,दि.08 : संपूर्ण जिल्ह्यात खरीप पिकांची स्थिती उत्तम आहे, परंतु येत्या सात-आठ दिवसात पाऊसही अत्यंत गरजेचा आहे. जर सात-आठ दिवस पाऊस लांबला तर परिस्थिती खूप गंभीर होवू शकते, असे मत जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी मंगळवारी (दि.08) पत्रकार परिषदेतून व्यक्त केले. पिण्याचे पाणी व चार्याचा प्रश्न तेवढा गंभीर होणार नाही, परंतु खरीप पिकांचे नुकसान होऊ शकते असेही ते म्हणाले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या एका पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी गावडे यांनी या जिल्ह्यात वार्षिक पर्जन्यमान जून ते सप्टेंबर या दरम्यान सरासरी 761.320 मिलीमीटर एवढे आहे. 1 जून 2023 ते आजपर्यंत पडलेला पाऊस 273.70 मिली मीटर एवढाच असून वार्षिक सरासरीच्या तूलनेत पडलेल्या पावसाची टक्केवारी 36 टक्के एवढीच आहे, असे जिल्हाधिकारी गावडे यांनी नमूद केले. या जिल्ह्यात 4 ऑगस्ट अखेरपर्यंत 5 लाख 4 हजार 757 हेक्टर क्षेत्रावर खरीपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या. पेरणी झालेल्या क्षेत्राची टक्केवारी 94.36 टक्के एवढी आहे, असे नमूद करीत जिल्हाधिकारी गावडे यांनी ऊसाचे लागवडीचे क्षेत्र वेगळे आहे, ते यात समाविष्ट नाही, असे म्हटले. जिल्ह्यातील 7 लाख 61 हजार 823 शेतकर्यांनी पिकविम्याच्या रक्कमा भरलेल्या आहेत. त्याचे क्षेत्र 5 लाख 1 हजार 68 हेक्टर एवढे आहे, असे नमूद केले.यावर्षी या जिल्ह्यात आतापर्यंतच्या पावसातसुध्दा 16 महसूल मंडळात अतिवृष्टी झाली. परभणी, पेडगाव, झरी, टाकळी कु., महातपुरी, कासापूरी, जिंतूर, सावंगी, बामणी, बोरी, आडगाव, दुधगाव, वालूर, कुपटा, मोरेगाव, ताडबोरगाव या गावांचा त्यात समावेश आहे. अतिवृष्टीमुळे आता पर्यंत दोन व्यक्तींचा मृत्यू झाला असून त्यात एक वीज कोसळून तर एकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. 5 मोठी जनावरे दगावली. तर शेतपिकांचे नुकसान 123.88 हेक्टर एवढ्या क्षेत्रावरील पिकांचे झाले. बाधित शेतकर्यांची ती संख्या 202 एवढी आहे, असे जिल्हाधिकारी गावडे यांनी स्पष्ट केले.