नगर : दफनभूमीसाठी तब्बल ३२ कोटी रुपयांना जागा खरेदी करून त्यावर आरक्षण प्रास्तावित करण्याच्या नगररचना विभागाच्या प्रस्तावाला महासभेत मंजुरी देण्यात आल्यानंतर मनपा सत्ताधारी व प्रशासनावर टीकेची जोड कुठली आहे. शिवसेना ठाकरे व शिंदे गट, राष्ट्रवादी, काँग्रेस, भाजप या पक्षाच्या नगरसेवकांनी लेखी विरोध दर्शवला आहे. त्यानंतर आता सत्ताधारी शिवसेनेच्या पक्षातील पदाधिकाऱ्यांकडूनही या विषयाला विरोध सुरू करण्यात आला आहे. युवा सेनेचे राज्य सचिव विक्रम राठोड व माजी महापौर भगवान फुलसौंदर यांनीही सदरचा ठराव विखंडित करण्याची मागणी करत घराचा आहेर दिला आहे. राठोड यांनी दफनभूमीसाठी ३२ कोटींच्या खरेदीचा व्यवहार झाल्यास महापालिकेचे कामकाज चालू देणार नाही, पालिका बरखास्त करून त्यावर प्रशासक नेमण्याची विनंती सरकारला करू, असा इशारा प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.
पालिकेचे मोठे आर्थिक नुकसान करून पदाधिकारी प्रशासनाला वेठीस धरून मनमानी ठराव करत असल्याचा आरोप करत राठोड यांनी अप्रत्यक्षपणे महापौरांवर निशाणा साधला आहे. पालिकेत आमची सत्ता असताना आमच्या डोळ्यादेखत बेकीयदेशीर ठराव करून मोठा आर्थिक लाभ होण्यासाठी भूखंडांचे श्रीखंड करून खाण्याचा डाव भाजपा आणि राष्ट्रवादीने अधिकाऱ्यांशी संगनमत करून मांडला आहे. हे आम्ही कदापि होऊ देणार नाही. पालिकेत सुरू असलेल्या या गैरकारभाराला सर्वस्वी अधिकारीच जबाबदार आहेत. जागा खरेदीचा ठराव आपल्या स्तरावर अमान्य करावा व विखंडित करण्यासाठी पाठवावा. मनपा स्थापनेनंतर शहर विकास आराखड्यामध्ये शहरांच्या सावेडी, केडगाव बुरुडगाव, माळीवाडा या चारही भागांसाठी शाळा, हॉस्पिटल, कचरा डेपो, स्मशानभूमीसाठी जागा आरक्षित केलेल्या आहेत. नवीन सावेडी जागेची खरेदी करणे अयोग्य आहे.
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)