प्रमोद डफळ जिल्हा प्रतिनिधी अहिल्यानगर
देवळाली प्रवरा – दि. ४ एप्रिल देवळाली प्रवरा नगरपरिषदेची पाणी कपात थांबवा करा किंवा पाणी पट्टी कमी करा अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष आप्पासाहेब ढूस यांनी नगरपरिषदेचे नूतन मुख्याधिकारी ऋषिकेश पाटील यांना निवेदन देवून केली आहे. देवळाली प्रवरा नगरपरिषदेचे नूतन मुख्याधिकारी पदी ऋषिकेश पाटील यांनी पदभार स्वीकारल्यानंतर आज प्रहार जनशक्ती पक्षाचे वतीने मुख्याधिकारी पाटील यांना प्रहार चे देवळाली प्रवरा शहर प्रमुख प्रकाश वाकळे यांचे हस्ते शाल व राज्यात अल्पावधीत विक्रीचा उच्चांक प्रस्थापित केलेले वैभव ढूस लिखीत अन्तः अस्ती प्रारंभ हे पुस्तक भेट देऊन स्वागत करण्यात आले. प्रसंगी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष आप्पासाहेब ढूस, देवळाली प्रवरा शहर प्रमुख प्रकाश वाकळे, राहुरी फॅक्टरी शहर प्रमुख शरद खांदे, शहर संघटक प्रभाकर कांबळे आदी उपस्थित होते. प्रसंगी आप्पासाहेब ढूस यांनी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, सध्या उन्हाळा सुरू झाला असल्याकारणाने विहीर आणि बोर ची पाणी पातळी घटली असून पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवू लागले आहे. त्यातच देवळाली प्रवरा नगरपरिषदेने आठवड्यातील एक दिवस पाणी कपात ठेवली असल्याने नागरिकांना भिषण पाणी टंचाई जाणवत आहे. त्यामुळे नगरपरिषदेने पाणी कपात थांबवावी किंवा आठवड्यातून एक दिवस पाणी कपात म्हणजे वर्षाला ४८ दिवस पाणी कपात. १८०० रुपये पाणी पट्टी मधील या ४८ दिवसांची २४० रुपये पाणी पट्टी नगरपरिषदेने कमी करावी. सबब वरील मागणी प्रमाणे नगरपरिषदेने एकतर पाणी कपात थांबवावी नाहीतर पाणी पट्टी तरी कमी करावी. ज्या दिवसी पाणी देत नाही त्या दिवसाची पाणी पट्टी मागणीचा नगरपालिकेला अधिकार नाही. त्यामुळे नागरिकांवर होणारा अन्याय तात्काळ थांबवावा अन्यथा प्रहार जनशक्ती पक्षाचे वतीने नगरपरिषद कार्यालयात कोणतीही पूर्व सूचना न देता नागरिकांसह ठीय्या आंदोलन केले जाईल असे निवेदनात म्हंटले आहे.


