विनोद कांबळे
चिफ ब्युरो मुंबई
मुंबई : देशासाठी बलिदान देणाऱ्या सैनिकांप्रती आदरभाव म्हणून सैनिक व त्यांच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी समाजातील सर्व घटकांनी पुढे येणे आवश्यक आहे आणि त्यासाठी ध्वजदिन निधी संकलनात सर्वांनी जास्तीत जास्त योगदान द्यावे असे आवाहन अपर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये-धुळे यांनी एका कार्यक्रमात केले आहे.ठाणे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयतर्फे जिल्हा नियोजन भवन येथे ध्वजदिन निधी संकलनचा शुभारंभ अपर जिल्हाधिकारी यांच्या हस्ते आज झाला त्यावेळी त्या बोलत होत्या.यावेळी ठाणे जिल्हा परिषदेच्या अपर मुख्य अतिरिक्त कार्यकारी अधिकारी डॉ.रुपाली सातपुते,अपर पोलीस अधीक्षक डॉ. दिपाली घाटे,भिवंडी- निजामपूर महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे,जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी,जिल्हा पुरवठा अधिकारी विकास गजरे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर प्रांजळ जाधव,जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप, शिक्षणाधिकारी (प्राथमिक)भाऊसाहेब कारेकर,सहाय्यक पोलीस आयुक्त (मुख्यालय-१)ममता लॉरेन्स डिसोझा, सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अशोक डोंगरे,माजी सैन्याधिकारी-सैनिक, शासकीय अधिकारी- कर्मचारी,विद्यार्थी आदी उपस्थित होते.अपर जिल्हाधिकारी जायभाये -धुळे म्हणाल्या कि ज्या सैनिकांमुळे आपण आपल्या दैनंदिन जीवनात सुरक्षितपणे राहत आहोत त्यांच्या व त्यांच्या कुटुंबाच्या प्रति आदरभाव ठेवून त्यांचा अभिमान बाळगणे हे आपले सर्वांचे नैतिक कर्तव्य आहे.१३६.६४% उद्दिष्ट्य पूर्ण केल्याचा आनंद असला तरी सर्वांनी ध्वजदिन निधी संकलनास आपले जास्तीत जास्त योगदान देवून विहित कालावधीत उद्दिष्ट्य पूर्ण करुन जिल्ह्याला अग्रेसर ठेवावे.अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.दिपाली घाटे यांनीही आपले मनोगत यावेळी व्यक्त केले.जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी प्रांजळ जाधव यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करुन प्रास्ताविक केले.ते म्हणाले कि मागील वर्षाप्रमाणेच यंदाही १ कोटी ८४ लक्ष ८० हजार रुपयांचे उद्दिष्ट्य आपल्याला मिळाले असून त्यापैकी २ कोटी ५२ लक्ष ५२ हजार १७१ इतका निधी संकलन झाला आहे. सन २०२३ साठी आपल्या जिल्ह्याने आतापर्यंत १३६.६४% निधी संकलनाचे उद्दिष्ट्य साध्य केले आहे. सन २०२३-२४ या वित्तीय वित्तीय वर्षात २७ लक्ष १ हजार२८०रुपयांची मदत विविध कारणांसाठी कल्याणकारी निधीतून वाटण्यात आली आहे. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली.यावेळी “अमर जवान”प्रतिमेला पुष्पचक्र वाहून शहिदांना आदरांजली वाहण्यात आली.याप्रसंगी विशेष गौरव पुरस्कारप्राप्त तसेच सशस्त्र सेना ध्वजदिन-२०२२ च्या निधी संकलनचे उल्लेखनीय कार्य केलेल्या व वेळेआधीच उद्दिष्ट पूर्तता केलेल्या विविध शासकीय विभाग/संस्था/व्यक्तींचा स्मृतीचिन्ह,प्रशस्तीपत्र व भेट वस्तू देवून सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात राज्यगीताने करण्यात आली तर सांगता राष्ट्रगीताने संपन्न झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन वृंदा दाभोलकर यांनी केले,आभार प्रदर्शन सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अशोक डोंगरे यांनी केले.याप्रसंगी दिलीप गुप्ते यांनी लिखाण केलेले व ठाणे जिल्हा माहिती अधिकारी सानप यांनी प्रस्तावना लिहिलेले “महारथी महाराष्ट्राचे भाग-४” या पुस्तकाचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. त्याचबरोबर ध्वजदिन निधी संकलन या विषयावर जनजागृतीपर लघुचित्रफितीचे उद्घाटनही करण्यात आले.या फिल्मसाठी विशेष योगदान दिलेल्या जिल्हा माहिती अधिकारी सानप,दिलीप गुप्ते,रिध्दीश पाटील, रमेश शेळके यांचा विशेष सन्मान करण्यात आला.सेना ध्वजदिन निधीला साह्य करणारा राज्यातील पहिलाच पत्रकार संघ ठरला आहे.
ठाणे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयतर्फे सशस्त्र सेना ध्वजदिन निधी २०२३ संकलनाला ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाकडून सढळ हस्ते हातभार लावण्यात आला. पत्रकार संघाच्या वतीने सशस्त्र सेना ध्वजदिन निधीसाठी ११ हजारांचा धनादेश जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर प्रांजळ जाधव (निवृत्त) यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे. याप्रसंगी जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांनी अशा प्रकारे निधी संकलनाला हातभार लावणारा राज्यातील हा पहिलाच पत्रकार संघ असून पत्रकारसंघाने उचललेले हे पाऊल समाजापुढे आदर्शवत असल्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.या कार्यक्रमात ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे, ठाणे जिल्हा पत्रकार संघ अध्यक्ष संजय पितळे, शहर पत्रकार संघ उपाध्यक्ष दीपक शेलार, सचिव निलेश पानमंद, खजिनदार विभव बिरवटकर,सहसचिव गणेश थोरात,सदस्य अमर राजभर,अनुपमा गुंडे आदींसह मनोज सिंह,अमोल कदम, रोहिणी दिवाण,विरेंद्र मिश्रा उपस्थित होते. याशिवाय लक्षवेधी परिवाराकडून डॉ.अतुल राठोड यांनी २५ हजार रूपयांचा धनादेश धनादेश जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडे सुपूर्द केला आहे.