संजय शिंदे
जिल्हा प्रतिनिधी पुणे
इंदापूर तालुक्यामध्ये पिढ्यान पिढ्यांपासून हिंदू-मुस्लीम समाज हा बंधुभावाने राहत असून, एकमेकांच्या सुख दुखात नेहमीच सहभागी राहिलेला आहे. इंदापूर तालुक्यातील हिंदू-मुस्लीम एकोपा राज्यामध्ये आदर्श असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ नवी दिल्लीचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी रविवारी (दि.15) केले.बावडा येथे जामा मस्जिदमध्ये हर्षवर्धन पाटील यांचे उपस्थितीमध्ये ईफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हर्षवर्धन पाटील बोलत होते. ते पुढे म्हणाले, स्वतःच्या गावातील इफ्तार पार्टीला उपस्थित राहण्यास वेगळाच आनंद असतो. आपण कायमच सर्वधर्मसमभावाच्या मूल्यांची जोपासना करीत राजकारण, समाजकारण केले आहे, करीत आहोत. जगातील कोणताही धर्म असो तो माणुसकीची शिकवण देतो, असे हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले. बावडा गावातील जामा मस्जिद परिसराच्या विकासासाठी आगामी काळातही निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, अशी ग्वाही यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी दिली.याप्रसंगी अशोकराव घोगरे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी उदयसिंह पाटील, अँड.अनिल पाटील, किरण पाटील, उमेश सूर्यवंशी, लक्ष्मण सावंत, हरिभाऊ बागल, मिलिंद पाटील, पवनराजे घोगरे, उपसरपंच रणजित घोगरे, महादेव शिंदे आदिसह ग्रामस्थ, मुस्लीम बांधव उपस्थित होते. यावेळी मुस्लिम समाजातील जेष्ठ कार्यकर्ते इन्नूस मुलाणी यांचा वाढदिवसानिमित्त तसेच गेली महिनाभर रोजे धरलेबद्दल हिंदू समाजातील तात्यासाहेब गायकवाड व अरुण गायकवाड यांचाही हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन समीर मुलाणी तर आभार रमजान शेख यांनी मानले.










