अयनुद्दीन सोलंकी
तालुका प्रतिनिधी, घाटंजी
घाटंजी : मागील अनेक वर्षांपासून (साधारणता 14 ते 15 वर्ष) ताडसावळी येथील ग्रामस्थांना हैराण करणाऱ्या 28 लालतोंडी माकडांना वन विभागाने जेरबंद केले आहे. ताडसावळी येथे मागील काही वर्षांपासून ग्रामस्थांना त्रस्त करून सोडलेल्या ताडसावळी गावातील 28 लाल तोंड्या माकडांना नुकतेच पिंजऱ्यात बंद करण्यात आले आहे. सांगली जिल्ह्यातील मिरज येथील वन्यजीव मित्र समशेर खान मनेर व त्यांच्या टीमने ही कामगिरी केली. त्यामुळे ताडसावळी येथील ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. ताडसावळी गावात मागील काही वर्षांपासून 30 ते 35 माकडांचा मुक्तसंचार होता. लाल तोंडी माकडांच्या उपद्व्यापामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले होते. या माकडांनी घरांच्या पत्रावर, छतावर निवारा करण्यास सुरुवात केल्याने माकडांचा धुडगूस अधिकच वाढला होता. टिन पत्रांवर आणि घरांच्या छतांवर माकडांचा वावर वाढल्याने टिन पत्रे खिळखिळे होऊ लागली होती. दुकानात घुसून बिस्किटे, चिप्सची पुडे व इतर खाद्यपदार्थ लंपास करणे. तसेच छतावर वाळू घालण्यात येणारे धान्याची नासाडी करणे, घरावरील डीश टिव्हीच्या छत्र्या हलविणे व इतर साहित्याची नासधूस या माकडांकडून केली जात होती. अनेक वेळा स्वयंपाक घरात घुसून भाकरी पळविण्याचे प्रकारही घडले आहे. या माकडांना अडविण्याचा प्रयत्न केला, तर अनेक महिलांवर हल्ला करून जखमी केल्याच्या घटना सुद्धा ताडसावळी येथे घडल्या आहेत. माकडांच्या या उपद्व्यापाला वैतागलेल्या ग्रामस्थांनी अनेक वेळा पांढरकवडा वन विभाग व पारवा वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालयात अनेकदा तक्रारी केल्या. माकडांचा बंदोबस्त करण्यासाठी ग्रामपंचायतीचा ठराव घेऊन वन विभागाकडे दाखल करण्यात आले. काही वर्षांपूर्वी वनविभागाचे शार्प शुटरचे पथकही ताडसावळी येथे आले होते. मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. त्यानंतर पारवा येथील वन परिक्षेत्र अधिकारी मनीष पवार, कुर्ली येथील वनपाल धम्मानंद मेश्राम, वनपाल शांतिदूत मुळे यांच्या मदतीने व ग्रामपंचायतीच्या व गावाकऱ्यांच्या पाठपुराव्याने सागली जिल्ह्यातील मिरज येथील वन्यजीव प्राणीमित्रांचे एक पथक नुकतेच ताडसावळी गावात दाखल झाले. या पथकातील समशेर खान मनेर, सुबहान खान व अल्ताफ आदींच्या सहकाऱ्यांनी गावाच्या मध्यभागी पिंजरा लावून 28 माकडांना कोणतीही इजा न होऊ देता मोठ्या शिताफीने पिंजऱ्यात जेरबंद केले. त्यामुळे ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. या सर्व माकडांना सुखरूप पणे टिपेश्वर अभयारण्यात नेऊन सोडण्यात आल्याचे वनपाल मेश्राम यांनी सांगितले. या कामगिरीने आंनदीत होऊन ताडसावळी येथील ग्रामस्थांनी ठेवलेल्या सत्काराच्या कार्यक्रमात वनविभागाचे उप वन संरक्षक किरण जगताप, सहाय्यक वन संरक्षक आर. बी. कोंडावार, पारवा येथील वन परिक्षेत्र अधिकारी मनिष पवार, वन्यजीव मित्र समशेर खान, कुर्ली बिटचे वनपाल तथा वन क्षेत्र सहाय्यक धम्मानंद मेश्राम, वनपाल शांतिदूत मुळे, सामाजिक कार्यकर्ते राजू बल्लूरवार आदींचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने वन विभागाच्या अधिकाऱ्यांचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच सौ. सोनल प्रशांत दोंतुलवार, उपसरपंच सौ. अनिता किष्टू शेरपूरवार, माजी सरपंच जयवंत चिल्लावार, किशोर चिल्लावार, रमेश कोटावार, ईस्तारी मडावी, प्रशांत दोंतुलवार, राजु कोवे, निरंजन गेडाम, रवींद्र मंगलपवार, अशोक सोनटक्के, किष्टू शेरपूरवार, गजानन येंड्रावार, नवनित पिटलावार, संतोष येरावार, सतिष बच्चुवार, दत्तात्रय पिटलावार यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.