भारत भालेराव
ग्रामीण प्रतिनिधी, शेवगाव
शेवगाव: विद्यार्थ्यांनी खेळाबरोबरच शिक्षणाची आवड निर्माण करावी. आपली संस्था ही जिल्ह्यातील गुणवत्तेच्या बाबतीत एक नंबरवर पोहोचली आहे.एफ डी एल संस्था ही उपक्रमशील संस्था आहे.जिल्ह्यात वीस वर्षांपूर्वी या संस्थेने प्रथम सेमी माध्यम आबासाहेब काकडे विद्यालयात सुरू केले.ही संस्था काळाच्या पुढे दहा पावले चालणारी संस्था आहे.ती गुणवत्तेच्या बाबतीत कोठेही कमी नाही.यावर्षी शिष्यवृत्ती परीक्षेचे संस्था स्तरावर नियोजन केले आहे.विद्यार्थ्यांनी व पालकांनी जागरूक राहणे ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन आबासाहेब काकडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य संपतराव दसपुते यांनी केले.ते आज पाचवी व इ आठवी शिष्यवृत्ती परीक्षा व एन एम एम एस परीक्षा संदर्भात आयोजित विद्यार्थी शिक्षक पालक मेळावा प्रसंगी व्यासपीठावरून ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक नानासाहेब मुटकुळे हे होते.व्यासपीठावर विद्यालयाच्या उपमुख्याध्यापिका सौ मंदाकिनी भालसिंग ज्येष्ठ शिक्षक अण्णासाहेब सोनवणे बाबुराव डमरे उपस्थित होते.पुढे बोलताना प्राचार्य श्री दसपुते म्हणाले की विद्यार्थ्यांनी आपले लक्ष अभ्यासावर केंद्रित करावे विद्यार्थ्यांच्या समस्या शिक्षकांनी व पालकांनी एकत्रितपणे सोडवल्यास विद्यार्थी जीवनात यशस्वी होतील. पालकांनी विद्यार्थ्यांना चांगल्या सवयी लावाव्यात.त्यांना प्रलोभने देऊ नये.सध्याचे युग हे स्पर्धेचे युग आहे इ पाचवी व आठवी ची शिष्यवृत्ती परीक्षा ही विद्यार्थ्याच्या पुढील शिक्षणाचा पाया आहे असे ते म्हणाले.यावेळी विद्यालयांमध्ये ई क्लास रूम सुरू करणार असल्याचे प्राचार्य दसपुते म्हणाले.यावेळी बोलताना विद्यालयाचे शिक्षक ज्ञानेश्वर गरड म्हणाले की विद्यार्थ्यांनी या स्तरावर कठोर मेहनत घेतल्यास भविष्यातील ताण कमी होईल.विद्यार्थी हेच आपली सर्वात मोठी गुंतवणूक आहे.त्यांच्या क्षमता वाढवण्यासाठी शिक्षक -पालक यांनी एकत्रित प्रयत्न करावेत.विद्यार्थ्याला येणाऱ्या अडचणी शिक्षक व पालक यांनी एकत्रित सोडवाव्यात. विद्यार्थ्यांनी ध्येय वेडे होऊन अभ्यास करावा असे गरड म्हणाले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक अण्णासाहेब सोनवणे यांनी केले सूत्रसंचालन रामदास पांढरे यांनी केले तर आभार श्रीम भाग्यश्री गडाख यांनी मानले.यावेळी शिष्यवृत्ती परीक्षा व एन एम एम एस परीक्षेसाठी मार्गदर्शन करणारे सर्व शिक्षक बंधू भगिनी उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक बंधू भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.