नेवासा : तालुक्यात गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने, जोमात असलेली खरीप पिके सुकू लागली आहेत. उन्हाची तीव्रता वाढल्याने व अंतर्गत मशागतीने जमिनीतील ओल कमी झाल्याने, कपाशीची वाढ खुंटली आहे. त्यावर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. पिके माना टाकू लागली आहेत. शेतकर्यांना पावसाची प्रतीक्षा लागली आहे. जूनपासून खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच पावसाने तुरळक व हलक्या स्वरूपात हजेरी लावल्याने शेतकर्यांनी तूर, बाजरी, सोयाबीन, कपाशी, मका, मूग आदी पिकांची पेरणी केली. त्यातील सर्वाधिक कपाशीची लागवड व सोयाबीन पिकाची पेरणी झालेली आहे. त्यानंतर अधूनमधून हलक्या स्वरूपातील पावसाच्या सरींमुळे पिके वाढली आहेत. त्यामुळे पावसाने उघडीप देताच शेतकर्यांनी आंतरमशागत, खुरपणी, फवारणी यावर मोठा खर्च केला आहे. परिसरात दमदार पाऊस नसला, तरी हलक्या सरींमुळे पिकांची वाढ झाली. मात्र, आंतरमशागतीत जमिनीतील ओल उडून पिकांना पाण्याची गरज भासू लागली आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने पूर्णपणे उघडीप दिली असून कडक ऊन पडू लागल्याने पिके सुकू लागली आहेत.
सध्या पिके जोमात आली असली, तरी मका, सोयाबीन ऐन फुलोर्यात असताना पावसाने दडी मारली आहे. परिणामी सोयाबीनची फूलगळ होत असून, मका करपत आहे, तर कपाशीची वाढ खुंटली आहे. तालुक्यात यंदा मक्याचे क्षेत्र वाढले असून, कापूस व सोयाबीनचा पेरादेखील वाढला आहे. त्यात सोयाबीन फुलात असताना पाऊस गायब झाला. याचा परिणाम उत्पन्नावर होणार असून, पिकांना पाणी देण्यासाठी शेतकरी आटापिटा करीत आहेत. बियाणे, खते, कीटकनाशक असा मोठा खर्च शेतकर्यांनी केला आहे.