वैरागड चे तलाठी करित आहे शेतकऱ्यांना मार्गदर्शन.
सौ.निलिमा बंडमवार
उपजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली.
गडचिरोली/आरमोरी :- शेतातील पिकांची व इतर माहिती नोंदविण्यासाठी शासनाने शेतकऱ्यांना अधिकार दिलेले आहे. ई पिक पाहाणीच्या माध्यमातून या नोंदी घेत असतांना उद्भवणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी वैरागड चे तलाठी सुभाष रासेकर हे शेतकऱ्यांच्या प्रत्येक बांधावर जाऊन मार्गदर्शन करीत आहेत. त्यामुळे ई पिक पाहणीस आरमोरी तालुक्यातील वैरागड मध्ये उत्तम प्रतिसाद मिळत आहे.शेतकरी हिताचे अनेक महत्वपूर्ण निर्णय घेताना शासनाने या वर्षीच्या खरिप हंगामापासून ई पिक पाहणी मोहिम राबवून शेतकऱ्यांना स्वतःच्या शेतातील नोंदी घेण्यास अधिकार प्रदान केले आहेत. शेतकऱ्यांच्या शेतातील इत्यंभूत माहिती ई पिक पाहणी या मोबाईल अँप्स च्या माध्यमातून आता स्वतः शेतकरी घेत आहेत. शेतीचे खाते क्रमांक, गट क्रमांक, एकूण क्षेत्रफळ, पिक लागवडीखालील क्षेत्रफळ, पोटखराब क्षेत्रफळ, पिकाचे नाव, सिंचनाचे साधन, लागवडीची दिनांक यांसारख्या माहितीचा समावेष यांमध्ये असून शेतकरी मोठया उत्सुकतेने ई पिक पाहणी शेतीच्या बांधावर जाऊन करीत आहेत. मात्र ग्रामिण भागात याबाबत शेतकऱ्यांना पुरेशे ज्ञान नसल्याने याबाबत माहिती देण्यासाठी वैरागड येथिल तलाठी सुभाष रासेकर हे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन उत्कृष्ट मार्गदर्शन करित आहेत. ग्रामिण भागात मोबाईलची उपलब्धता, मोबाईल नेटवर्क यांसारख्या समस्या असतांना एका मोबाईलमध्ये विस शेतकऱ्यांचा शेतीचे ई पिक पाहणी करण्यास तलाठ्यांकडून मार्गदर्शन मिळत आहे. शिवाय तरुणांना प्रोत्साहित करुन या कार्यात त्यांचा सहभाग वाढविण्यासाठी तालाठ्यांकडून वारंवार प्रयत्न सुरू आहे.ई पिक पाहणीला उत्तम प्रतिसाद मिळत असला तरी उद्धिष्ट पूर्ण करण्यासाठी कालावधी अपूर्ण पडत असल्याने शासनाने ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ दिली आहे. वैरागड, मेंढेबोडी, पाठणवाडा व हिरापूर रिठ या गावांचा वैरागड तलाठी कार्यालयांतर्गत समावेश होतो. भौगोलिक क्षेत्र व्यापक असल्याने एवढ्या मोठ्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करुन ई पिक पाहणीचे उद्दीष्ठ गाठणे ही तारेवरची कसरत असली तरी तलाठी सुभाष रासेकर हे कसोशीने प्रयत्न करित आहेत. ई पिक पाहणी पासून एकही शेतकरी वंचित राहू नये अशी अपेक्षा करीत शेतकऱ्यांनी उद्भवणाऱ्या अडचणींकरिता तलाठी कार्यालयाशी संपर्क साधून मार्गदर्शन घ्यावे असे आवाहन तलाठी सुभाष रासेकर यांनी केले आहे.