वाशिम : राज्यात कोरोना संसर्गासोबतच नव्या ओमिक्रॉन विषाणूचा धोका वाढायला सुरुवात झाली आहे. मुंबई, पुणे, ठाणे व पालघर या जिल्हयात मोठया प्रमाणात बाधित रुग्ण आढळून येत आहे. याच महानगरातून जिल्हयात मोठया प्रमाणात नागरीकांचे येणे-जाणे सुरु आहे. त्यामुळे जिल्हयात सुध्दा कोरोना व ओमिक्रॉन विषाणूच्या संसर्गाचा धोका वाढला आहे. राज्याच्या लसीकरणाच्या तुलनेत जिल्हयाच्या लसीकरणाचे प्रमाण कमी आहे. राज्य शासनाच्या 27 नोव्हेंबर 2021 च्या आदेशाने जिल्हयात संपूर्ण लसीकरणाची आवश्यकता असल्याचे विषद केले आहे.
जिल्हयात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून लसीकरण मोहिम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. काही पात्र नागरीक आजही लसीकरणापासून दूर आहे. वाढता कोरोना व ओमिक्रॉन संसर्गाचा धोका लक्षात घेता लसीकरण करणे आवश्यक आहे. ज्या व्यक्तींनी लसीचा पहिला डोस घेतला नाही परंतू ज्यांना नोंदणीकृत वैद्यकीय अधिकाऱ्याने लस न घेण्याचे प्रमाणित केले आहे. अशा व्यक्ती वगळून, ज्या व्यक्ती लसीकरणाच्या दुसऱ्या डोससाठी पात्र आहे परंतू त्यांनी दुसरा डोस घेतला नाही अशा व्यक्तींना किंवा त्यांच्या कुटूंबातील व्यक्तींना कोविड विषाणूची बाधा झाल्यास किंवा असे व्यक्ती कोविड पॉझिटीव्ह असणाऱ्या व्यक्तीच्या संपर्कात येऊन जास्त जोखमीच्या प्रवर्गात येत असल्यास त्यांना कोणतेही लक्षणे नसले तरीही त्यांना सुट न देता कोविड केअर सेंटर येथे सात दिवसासाठी थांबणे जिल्हाधिकाऱ्यांचे या आदेशाने बंधनकारक करण्यात आले आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या विरुध्द तरतुदीनुसार शिक्षा करण्यात येईल. हा आदेश 6 जानेवारीपासून जिल्हयातील शहरी आणि ग्रामीण भागासाठी लागू राहील.