मकरंद जाधव
तालुका प्रतिनिधी, श्रीवर्धन
श्रीवर्धन : तालुक्यातील बोर्लीपंचतन गावचे नामदेव भिकाजी कळस यांनी नुकताच वयाच्या ९३ व्या वर्षी बोर्लीपंचतन येथील त्यांच्या निवास्थानी अखरेचा श्वास घेतला.म्हसळा तालुक्यामध्ये जन्म झालेल्या नामदेव कळस यांनी १९५५ ते १९६० या काळात मुंबईतील बसंत स्टूडीओमध्ये प्रसिध्द कला दिग्दर्शक यांच्याकडे सहाय्यक म्हणून काम करीत असताना मुंबईतील विविध सार्वजनिक गणेश मंडळांसाठी आपल्या कलेचे योगदान दिलं.मात्र त्यानंतर बोर्लीपंचतन गावात स्थायिक होऊन उपजीविकेसाठी कपडे शिवण्याचा स्वतःचा व्यवसाय चालू केला.शिवण कामाबरोबरच त्यांनी नेपथ्य, दिग्दर्शन व संगीताची कला जोपासली होती.बोर्लीपंचतन येथील संगीतप्रेमी तरुणांनी स्थापन केलेल्या सुरसंगम या कला मंडळाचे पहीले अध्यक्षपद त्यांनी भूषवलं. अल्पावधीतच नावारुपाला आलेलं सूरसंगम कलापथक त्यांच्या तबला आणि पेटीच्या तालावर गणेशोत्सवादरम्यान संगीतप्रेमी लोकांच्या घरी जाऊन आपल्या कलेने गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित करु लागलं.जेमतेम आर्थिक परिस्थिती असलेल्या या कलाकाराला सभा, समारंभामध्ये सन्मानाचं स्थान मिळाल नसलं तरी आपल्या विविध कला,गुणांनी बोर्लीपंचतन वासियांच्या मनात मात्र त्यांनी स्थान मिळवलं होत.या मितभाषी कलाकारच्या निधनाने संगीताचा सुर हरपला आणि चित्रकलेचे रंग फिके पडले एवढं मात्र खरं.त्यांच्या पश्चात पत्नी,मुलं,मुली,सुना, नातवंड असा मोठा परीवार आहे.


