श्रद्धा गढे
शहर प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा :-तेल्हारा वरून निंबा मार्गे -अकोला जाणाऱ्या बसफेऱ्या खराब रस्त्यामुळे बंद करून त्याऐवजी भांबेरी व पंचगव्हान मार्गे बसफेऱ्या वाढविण्यात आल्याची माहिती तेल्हारा आगार प्रशासना कडून देण्यात आली आहे. तेल्हारा- निंबा मार्गे -अकोला हा रस्ता निमकर्दा ते भौरद दरम्यान अतिशय खराब अवस्थेत आहे, रस्त्यावर दररोज वाहने फसत असल्याने वाहतुकीस खोळंबा होत आहे व बसेस उशिरा धावत असल्याने प्रवाशांची सुद्धा गैरसोय होत असल्याने एसटी महामंडळाची अपरिमित हानी होत आहे. या मार्गावर फेऱ्या मारणारे चालक देखील वारंवार या मार्गांवर बसेस पलटी होऊन अपघात होण्याची शक्यता असल्याच्या सूचना लॉकशीटवर नमूद करीत आहेत. त्यामुळे या सर्व बाबींचा विचार करून व या मार्गांवर बसफेऱ्या सुरु ठेवल्यास भविष्यात अपघाताची शक्यता पाहता होणारे नुकसान टाळण्याकरिता या बसफेऱ्या भांबेरी व पंचगव्हान मार्गे अकोला कडे वळविण्यात आल्या असल्याची माहिती तेल्हारा आगार प्रमुख संतोष वानरे यांनी दिली आहे.