पवन मनवर
तालुका प्रतिनिधी यवतमाळ
यवतमाळ: शाळेत आहार शिजवून विद्यार्थ्यांना प्रेमाचा घास वाढणाऱ्या महिलांनी सोमवारी थेट जिल्हा परिषदेवर धडक देत दरमहा २६ हजार रुपये मानधन देण्याची मागणी केली.महाराष्ट्र राज्य कर्मचारी युनियनच्या (आयटक) नेतृत्वात यावेळी शेकडो महिलांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली.तब्बल २० वर्षे या महिलांना केवळ हजार रुपये मानधनावर राबविण्यात आले. आता एप्रिलपासून त्यांचे मानधन अडीच हजार केले. मात्र तेही वेळेवर मिळत नाही. या कर्मचाऱ्यांच्या मानधनासाठी केंद्रसरकारने ६० टक्के व राज्य सरकारने ४० टक्के निधी देण्याचे ठरले आहे. सध्या केंद्र शासन दरमहा ६०० व राज्य शासन १९०० असे एकत्रित २५०० मानधन देत आहे. राज्य शासनाने आपल्या कोट्यात वाढ करून १९०० रुपये केले. परंतु केंद्रसरकारने वाढ केली नाही. त्यातही मानधन चार पाच महिने विलंबाने मिळते. त्यामुळे रोष आहे. शिवाय या महिलांना शाळेतील इतरही कामे करायला भाग पाडले जाते. त्यामुळे पूर्णवेळ कर्मचारी म्हणून मान्यता द्यावी, अशीही मागणी यावेळी करण्यात आली. मागण्यांचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री व पंतप्रधानांना पाठविण्यात आले.