अविनाश पोहरे
ब्युरो चिफ, अकोला
पातूर : तालुक्यातील शिर्ला ग्रामपंचायतच्या सरपंच अर्चना सुधाकर शिंदे यांनी शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याच्या कारणावरून जिल्हाधिकारी यांनी सरपंच अर्चना शिंदे यांना अपात्र घोषित केले होते. यानंतर आयुक्त यांनीसुद्धा जिल्हाधिकारी यांचा निर्णय कायम ठेवत अर्चना शिंदे यांना अपात्र घोषित केले होते . परंतु ,या दोन्ही आदेशाच्या विरोधात अर्चना शिंदे यांनी उच्च न्यायालयात दाद मागितल्यानंतर गुरुवारी उच्च न्यायालयाने एकाच दिवसात या प्रकरणावर सुनावणी करत गैरअर्जदार याचा अपात्रतेचा अर्ज खारीज करत अर्चना शिंदे यांना सरपंचपदावर कायम ठेवले आहे. पातूर येथील अनंत बगाडे यांनी शिर्ला ग्रामपंचायतच्या सरपंच अर्चना सुधाकर शिंदे या राहत असलेल्या मालमत्ता ३०५३/१३० शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याचे प्रकरण अकोला जिल्हाधिकारी यांच्याकडे दाखल केले होते. यावरून जिल्हाधिकारी यांनी शिर्ला ग्रामपंचायत ग्राम विकास अधिकारी यांना शिर्ला ग्रामपंचायतीच्या सरपंच अर्चना सुधाकर शिंदे या मालमत्ता क्रमांक ३०५३/१३० मध्ये राहतात किंवा मालमत्ता क्रमांक १४ २१ मध्ये राहतात , याबाबत स्वयंस्पष्ट अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यावरून ग्रामविकास अधिकारी यांनी स्वयंस्पष्ट अहवाल सादर केला.ज्यामध्ये शिर्ला ग्रामपंचायतचे सरपंच अर्चना सुधाकर शिंदे या मालमत्ता क्रमांक ३०५३ / १३० मध्ये राहत नसून त्या मालमत्ता क्रमांक १४२१ मध्ये राहतात. ज्याचे कायदेशीर क्षेत्रफळ १०८९ असून , प्रत्यक्ष मोका पाहणी केली असता , शिर्ला ग्रामपंचायत सरपंच अर्चना शिंदे यांनी १८७ चौरस फूट शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याचे नमूद केले . त्यावरून शिर्ला ग्रामपंचायत सरपंच सदस्य अर्चना सुधाकर शिंदे यांना या पदावरून अकोला जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी अपात्र घोषित केले होते. यानंतर अमरावती आयुक्त यांनीसुद्धा जिल्हाधिकारी यांचा अपात्रतेचा आदेश कायम ठेवला होता.परंतु या दोन्ही आदेशाच्या विरोधात अर्चना शिंदे यांनी उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठाकडे दाद मागितली होती. गुरुवारी एकाच दिवशी या प्रकरणाची सुनावणी घेत उच्च न्यायालयाने सरपंच यांनी कोणत्या जागेवर अतिक्रमण केले याबाबत स्पष्टता नसल्याने एमजीपीच्या कलम ४ ( १ ) ( ३ ) अंतर्गत गैरअर्जदार अनंत बगाडे यांचा अर्ज खारीज केला. यामुळे सौ.अर्चना शिंदे या शिर्ला सरपंच या पदावर कायम राहिले असून , उच्च न्यायालयाने एकाच दिवशी या सर्व प्रकरणावी सुनावणी घेऊन प्रकरण निकाली काढले आहे.सरपंच सौ.अर्चना शिंदे यांच्या वतीने सीनियर ऍड. समीर सोहनी व ऍड. सुकुत सोहनी यांनी काम पाहिले.