बुलडाणा : कोविडकाळात समाजातील प्रत्येक घटकाला मोठा फटका सहन करावा लागला. कोरोनामुळे समाजाला निरोशेने ग्रासले. या कठीण काळात प्रत्येकाला मदतीची गरज होती. कोविड काळात मोठे, लहान कुणीही सुटले नाही. त्यामध्ये बालकांचे अपरीमीत नुकसान झाले. राज्यात अनेक बालकांनी आपले आई वडील गमाविले. त्यामध्ये जिल्ह्यातील बालकही सुटले नाही. कोरोनाने जिल्ह्यात 507 बालकांचे बालपण हिरावले. कोरोनाने आई व वडील दोन्ही पालक गेलेले अशी 13 बालके अनाथ झाली. तसेच 494 बालकांनी आपले आई किंवा वडील गमाविले. मात्र शासनाने कोविडमुळे पालकत्व गमाविलेल्या बालकांना वाऱ्यावर न सोडता त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची भूमिका घेतली.
जिल्ह्यात कोरोनाने अनाथ झालेल्या 13 बालकांना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासनाने 5 लाख रूपयंची मुदत ठेव महिला व बालकल्याण विभागाच्या माध्यमातून देण्यात आली. या मुदत ठेव प्रमाणपत्राचे वितरण पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांचेहस्ते करण्यात आले. तसेच जिल्ह्यात कोरोना एक पालक झालेल्या बालकांची संख्या 494 असून यापैकी 338 बालकांना बाल संगोपन योजनेचा लाभ देण्यात आला. त्यांना प्रति महिना 1100 रूपये देण्यास मान्यता देण्यात आली. अशाप्रकारे शासनाने पालकत्वाची भूमिका साकारत कोविड काळात पालकत्व गमाविलेल्या बालकांचे संगोपण करण्याचा निर्णय घेतला. केवळ आर्थिक सहाय्य न देता शासनाने अशा बालकांच्या संपत्ती टिकविण्यासाठी कायद्याचा आधार घेत त्याचे संरक्षण करण्याचे कामही केले. तसेच अनाथ झालेल्या बालकांना शासनाने अनाथ प्रवर्गातील आरक्षणाचा लाभ देण्यासाठी अनाथ प्रमाणपत्राचे वितरणही केले. त्यामुळे भविष्यात अशा बालकांना अनाथ प्रवर्गासाठी राखीव असलेल्या जागांवर नियुक्ती मिळणे सोयीचे होणार आहे. महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून शासनाने कोविड काळात पालकत्व गमाविलेल्या बालकांच्या पाठीशी उभे राहत माणूसकीचे मुर्तिमंत उदाहरण उभे केले आहे.


