गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
स्वातंत्र्याची ७४ वर्ष पूर्ण झाली तरी सुद्धा तेल्हारा तालुक्यातील ९५ गावापैकी ३९ गावांमध्ये अद्यापही स्मशानभूमी नाही तर काही गावांमध्ये स्मशानभूमीकडे जाण्याकरिता रस्ता नाही. त्यामुळे शेतात किंवा रस्त्याच्या कडेला अंतिम संस्कार करावी लागतात. यामुळेच तेल्हारा तालुका अनेक समस्यांच्या विळख्यात सापडला आहे तालुक्यात एकूण ९५ गावे आहेत. यापैकी कळमखेड, बारुखेडा. नागरतास, बोरव्हा, भोकर, सदरपुर, निंबोळी,धोंडा आखर, कही रुपागड, चीपी, हिंगणी खुर्द, हयातपुर, उभारखेड, खेल सटवाजी, खेल कृष्णाजी खेल मुकादम, कोठा, नेर, चाफानेर, निंबोरा खुर्द, पिवंदळ खुर्द, सांगवी, सोनवाडी, शेरी खुर्द, शेरी वडनेर, मालाटणा बुद्रुक, टाकळी, तळेगांव खुर्द, मालठाना खुर्द, तळेगाव पातूर्डा, तळेगांव वडनेर, वांगरगाव, बादखेड, चंदनपुर, चिचारी, दिवाणझरी उमरशेवळी व मोहपाणी या गावांमध्ये स्मशानभूमीसाठी जागाच उपलब्ध नाही त्यामुळे मृतकांच्या नातेवाईकांना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागतो त्यांना रस्त्याच्या कडेला किंवा कुणाच्या तरी शेतात अंतिम संस्कार करावे लागतात.चितलवाडी खापरखेड मनात्री बुद्रुक मनात्री खुर्द आणि पिंपरखेड या गावांमध्ये स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध आहे पण पाणी पावसाच्या दिवसात प्रेताला दहन देण्यासाठी शेड नाही. तसेच अडसूळ आणि अटकळी येथील स्मशानभूमीतील शेडची दुरावस्था झालेली आहे तर शेरी बुद्रुक शेरी खुर्द आणि शेरी वडनेर यातील गावातील लोक एकाच स्मशानभूमी शेडचा वापर दहन देण्यासाठी करतात. तर कुठे स्मशानभूमीकडे जाण्याकरिता रस्ता उपलब्ध नाही अशी भयावह परिस्थिती तेल्हारा तालुक्यात निर्माण झाली आहे. यातून नागरिकांना बाहेर काढण्यासाठी स्थानिक नेतृत्वाने पुढाकार घेण्याची गरज आहे.
‘गाव तेथे स्मशानभूमी’ ची गरज
देशातील नागरिकांची जीवनमान उंचावण्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून विविध योजना राबवल्या जातात. हे निर्विवाद सत्य असले तरी मानवी जीवनाचा शेवट गोड व्हावा यासाठी गाव तेथे स्मशानभूमी असणे तेवढेच गरजेचे आहे. अकोला लोकसभा मतदारसंघाची खासदार, अकोट विधानसभा मतदार संघाचे आमदार, पालकमंत्री, जिल्हाधिकारी अशा सर्व जबाबदार लोकांनी यामध्ये पुढाकार घेऊन गाव तेथे स्मशानभूमी हे तत्व राबवावे लोकांच्या यातना कमी कराव्या अशी माफक अपेक्षा स्मशानभूमी नसलेल्या गावातील नागरिकांची आहे.