राज्यस्तरीय सोयाबीन परिषदेचे कृषि मंत्री दादाजी भुसे
यांच्या हस्ते उत्साहात उद्घाटन
जुबेर शेख
जिल्हा प्रतिनिधी लातुर
लातूर/दि.16 महाराष्ट्र शासन कृषि विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने कृषि महाविद्यालय सभागृह लातूर येथे राज्यस्तरीय सोयाबीन परिष 2021 चे उद्घाटन राज्याचे कृषि,माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले.
या उद्घाटन कार्यक्रमास राज्याचे पर्यावरण, पाणीपुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), रोजगार हमी, भूकंप पुनर्वसन व संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे,उस्मानाबादचे खासदार ओमराजे लिंबाळकर, आमदार बाबासाहेब पाटील, आमदार ज्ञानराज चौघुले, आमदार कैलास पाटील, माजी आमदार पाशा पटेल, परभणी कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.अशोक ढवण, कृषि सचिव एकनाथ डवले, कृषि आयुक्त धीरज कुमार, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना कृषि मंत्री भुसे म्हणाले की, आज लातूर येथे राज्यस्तरीय सोयाबीन परिषद 2021 चे आयोजन करण्यात आल्यामुळे या भागातील सोयाबीन पीक घेणाऱ्या सर्वच शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. राज्यात सोयाबीन पीकाची उलाढाल प्रति वर्षी 40 ते 50 कोटी होत आहे. शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाची पेरणी शास्त्रोक्त पध्दतीने करण्याचे आवाहन त्यांनी केले.तसेच लातूर येथे सोयाबीन संशोधन केंद्र उभारणी बाबत मागणी होत आहे. या बाबत राज्य शासन सकारात्मक विचार करेल असे कृषि मंत्री दादाजी भुसे यांनी स्पष्ट केले.
राज्यात मागील काही दिवसात पावसाचा खंड पडल्याने सोयाबीन पीकाचे नुकसान झाले आहे.कृषि विभागाने याची नोंद घेतली असून कृषि विभागातील त्या त्या विभागातील क्षेत्रीय कर्मचाऱ्यांनी संबंधीत शेतकरी बांधवाशी संपर्क साधून ऑफ लाईन किंवा साध्या अर्जाव्दारे पिक विमा कंपन्यांना कळवावे असे सुचित केले.राज्य शासन शेतकऱ्याच्या कायम पाठीशी उभे असून शेतकऱ्यांसाठी जे जे करता येईल् ते करणारच आहे.राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे तर राज्यातील शेतकऱ्यांना अन्न देवता म्हणून संबोधीत करत आहेत.असे त्यांनी यावेळी नमुद केले.
यावेळी राज्यमंत्री संजय बनसोडे म्हणाले की, राज्याच्या कृषि विभागाने लातूर येथे राज्यस्तरीय सोयाबीन परीषदेचे आयोजन केल्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो.जिल्हयात राज्यस्तरीय सोयाबीन परीषद होत असल्याने जिल्हयातील शेतकऱ्यांना याचा निश्चितच फायदा होणार आहे.शेतकऱ्यांनी अधूनिक पध्दतीने शेती करुन उत्पन्न वाढविण्याचे प्रयत्न करावे.आपल्या भागात सोयाबीनचे क्षेत्र तर भरपूरच आहे. आपण या सोयाबीन पिकास हिरवं सोने म्हणण्यास हरकत नाही. सोयाबीन पीकाची पेरणी बीबीएफ पेरणी यंत्राव्दारे करावी असे सांगून त्यांनी लातूर हे सोयाबीन पंढरीची ठिकाण असल्याने येथे सोयाबीन संशोधन केंद्र करावे अशी विनंती कृषि मंत्री दादाजी भुसे यांच्याकडे केली.
या प्रसंगी कृषि मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते जिल्हयातील सोयाबीन पिक घेणारे प्रगतशील शेतकरी अजित फुलसुंदर, रुपेश कारंजे, संग्राम भोसले, बाळासाहेब पवार व शिवाजी कनेरे यांचा सत्कार करण्यात आला.तसेच परभणी कृषि विद्यापीठाने तयार केलेल्या घडीपत्रिकेची विमोचन केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी कृषि मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते चित्ररथ व कृषि प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.
प्रारंभी राज्याचे कृषि सचिव एकनाथ डवले, परभणी कृषि विद्यापीठाचे कुलगुरु अशोक ढवण यांचे मार्गदर्शनपर भाषणे झाली. या कार्यक्रमाचे स्वागतपर भाषण जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. केले असून या कार्यक्रमास कृषि विभागातील तज्ञ, प्रगतशील शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रस्तावीक कृषि आयुक्त धीरज कुमार यांनी तर कार्यक्रमाचे आभार अजित फुलसुंदर यांनी मानले.