अमरावती : वलगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात राहणाऱ्या मुलीचे परिचित मुलासोबत काही महिन्यांपुर्वी साक्षगंध झाले आहे. मात्र मुलगी 18 वर्षाची पूर्ण व्हायची आहे, म्हणून मुलीच्या कुटूंबियांनीनी तोपर्यंत लग्न थांबवले होते. दरम्यान चार दिवसांपूर्वी मुलीचा भावी पती तीच्या घरी आला, त्यावेळी मुलीची आई घरी होती. भावी जावयासाठी त्या पाणी आणायला घरात गेल्या, त्यावेळी या भावी जावयाने त्याच्या अल्पवयीन भावी पत्नीला घेवून पोबारा ठाेकला. या प्रकरणी मुलीच्या आईने शुक्रवारी (दि. 18) वलगाव पोलिसात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी त्या मुलाविरुध्द अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. अल्पवयीन मुलगी व 22 वर्षीय मुलगा यांचे कुटुंबियांनी 20 मार्च 2022 ला साक्षगंध करुन दिले. साक्षगंध झाले मात्र मुलीचे वय अजूनही 18 वर्ष पूर्ण झालेले नाही. मुलगी 3 जानेवारी 2023 रोजी वयाची 18 वर्ष पूर्ण करणार आहे. मुलगी अठरा वर्षांची झाल्यानंतरच तीचे लग्न करुन देण्याबाबत मुलीच्या कुटुंबियांची स्पष्ट भूमिका आहे.
दरम्यान 14 नोव्हेंबरला मुलीचा भावी पती त्याच्या एका मित्रासह मुलीच्या घरी आला. त्यावेळी मुलीची आईसुध्दा घरीच होती. भावी जावाई घरी आल्यामुळे त्याला घरात बसवून मुलीची आई पाणी आणण्यासाठी घरात गेली. त्या पाणी घेवून आल्यानंतर पाहीले तर हा मुलगा त्या ठिकाणी नव्हता. त्यामुळे मुलीच्या आईने तीच्या मुलीला आवाज दिला तर मुलगीसुद्धा घरातून प्रतिसाद देत नव्हती, कारण तीसुद्धा घरात नव्हती. त्यावेळी मुलीच्या आईच्या लक्षात आले की, घरी आलेल्या त्या भावी जावाई मुलानेच मुलीला पळवून नेले आहे. वास्तविकता मुलीला मुलाने ज्या दिवशी पळवून नेले, त्या दिवसांपासून मुलीला अठरा वर्ष पूर्ण होण्यासाठी केवळ 50 दिवसांचाच कालावधी बाकी होता, त्यानंतर त्यांचे लग्न करुन देण्याची मुलीच्या कुटूंबियांनी सांगितले होते.
मात्र तरीही त्याने मुलीचे अपहरण केले आहे. अपहरण झाल्यानंतरही चार दिवस मुलीच्या कुटूंबियांनी मुलगी घरी येईल, म्हणून प्रतीक्षा केली, मुलाच्या घरीसुध्दा माहीती घेतली मात्र तो घरीही नव्हता. त्यामुळेच मुलीच्या आईने वलगाव पोलिस ठाणे गाठून त्या मुलाविरुध्द व त्यासोबत आलेल्या मित्राविरुध्द तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी मुलीचे ज्या मुलासोबत साक्षगंध झाले आहे, त्याच्यासह त्याच्या मित्राविरुध्द अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान अपह्त मुलीचा आम्ही शोध घेत असल्याचे वलगावचे ठाणेदार सुरेन्द्र अहेरकर यांनी सांगितले.