बिबी : सततच्या नापिकीला कंटाळलेल्या अल्पभूधारक शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. सिंदखेडराजा तालुक्यातील चिखला काकड येथे आज, ८ ऑगस्ट रोजी दुपारी सव्वाबाराला ही घटना घडली. विठ्ठल संपत नागरे(४०, रा. चिखला काकड) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. विठ्ठल नागरे हे अल्पभूधारक शेतकरी आहेत. सततच्या नापिकीला ते कंटाळले होते. त्यामुळे आज दुपारी घरातले इतर लोक शेतात गेलेले असताना त्यांनी गळफास घेतला. घटनेची माहिती मिळताच बिबी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला. मृतक विठ्ठल नागरे यांच्या पश्यात आई, पत्नी, २ मुली, १ मुलगा,१ भाऊ, १ बहीण असा परिवार आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोहेकॉ दिनेश चव्हाण, पोकॉ रोहिदास पांढरे करीत आहेत.


