महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती दि.3-:चंद्रपुर जिल्ह्यातील बल्लारपूर येथील एफ.डी.सी.एम. वसाहतीत डुकरांचा हैदोस सुरू असून या समस्येकडे अधिकारी वर्ग लक्ष देईल काय ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. बल्लारपूर येथील वनविभाचे कार्यालय जिल्ह्यातील एक महत्त्वपूर्ण कार्यालय समजले जाते. या शहरात एफ.डी.सी.एम.चे आगार आहे. येथील अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकरिता उत्तम वसाहत तयार करण्यात आली आहे. फार जुनी वसाहत आहे. परंतु इतक्या चांगल्या वसाहतीला कोणाची दृष्ट लागली कोणास ठाऊक, ही वसाहत आता अनेक समस्यांचे माहेरघर बनली आहे. या वसाहतीतील जुनी निवासस्थाने दुरुस्त करण्यात आले आहे. निवासस्थानातील व्यवस्था चांगली आहे. परंतु संपूर्ण वसाहतीत निवासस्थानांच्या आजुबाजुला डुकरांचा हैदोस सुरू आहे. त्यामुळे वसाहतीत राहणा-या नागरिकांना दुर्गंधी आणि घाणीचा सामना करावा लागतो. या ठिकाणी अनेक अपघातसुद्धा झाले आहेत. वसाहतीला लागुनच मुख्य रस्ता आहे. या रस्त्याने वाहने भरधाव वेगाने जातात. येथील कर्मचाऱ्यांची मुले येथे खेळत असतात. तसेच येथे लाकडांचा लिलाव होत असतो. त्यामुळे मोठी गर्दी असते. परंतु हंगामी कामगार (चौकीदार) लक्ष देत नाही. ते फक्त अधिका-यांना सॅल्युट मारण्याचे काम करतात. या वसाहतीत राहणारे वनपाल चौकीदारांनी सॅल्युट का मारले नाही म्हणून त्यांच्यावर चिडतात. रात्रीच्या वेळी वाघ, अस्वल यासारख्या हिंस्र प्राण्यांचे आगमन होत राहते. यांच्यापासून नागरिकांचे संरक्षण करण्याऐवजी हंगामी कामगार मस्त झोपून राहतात. त्यांना काही म्हटल्यास, तुझ्यात दम असेल तर आम्हाला नोकरीतून काढून दाखव असे उत्तर हंगामी कामगाराकडून ऐकायला मिळते. या प्रकाराकडे संबंधित अधिकारी सुद्धा लक्ष देत नाहीत. हिंस्र प्राण्यांचा एखादा हल्ला झाल्यानंतर या बाबींकडे अधिकारी लक्ष देतील काय ? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. तसेच या वसाहतीत प्रेमी युगुल चाळे करताना आढळून आले आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या लहान मुलांवर विपरीत परिणाम होत आहे. या सर्व गोष्टींची दखल घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे.