मनोज भगत
ग्रामीण प्रतिनिधी हिवरखेड
हिवरखेड : येथील केळी,पपई व कांदे पिकाची पाहणी करून या परिसरातील शेतकरी हे प्रयोगशील शेतकरी असल्याने त्यांनी अधिक उत्पन्न वाढीसाठी सेंद्रिय शेतीत रस घ्यावा असे मनोगत अकोला येथील मिग्स क्लासेस चे संचालक अजय देशपांडे यांनी केले.यावेळी त्यांनी शेतकऱ्यांसोबत चर्चा करतांना सांगितले की, सेंदिय शेती म्हणजे नैसर्गिक साधनाचा वापर करून औषध, खते तयार करणे व पारंपारिक बियाणाचा वापर करून केलेली विषमुक्त म्हणजेच रसायनाचा वापर टाळून केलेली शेती म्हणजे सेंद्रिय शेती होय. सेंद्रिय शेती म्हणजे परंपरागत शेती होय. शेती करताना रसायनाचा वापर न करता केवळ शेतातील पिकांचे अवशेष, शेण, गोमूत्र व नैसर्गिक साधनांचा वापर करून सेंद्रिय शेती केली जाते. हरितक्रांतीच्या अगोदर शेतामध्ये केवळ शेणखत वापरत असत. बियाणे सरळवाण म्हणजेच कोणत्याही प्रकारची प्रकिया न केलेले वापरत. यामुळे पिकांची गुणवत्ता वाढत असे. जमिनीमध्ये कर्ब योग्य प्रमाणात राहिल्यामुळे जमिनीची सुपीकता वाढून पिकाची वाढ योग्य होऊन उच्च प्रतीच्या व आरोग्यास पोषक असण्याऱ्या उत्पादनाची निर्मिती होत होती. तरी येथील प्रगतशील शेतकरी यांनी सेंद्रिय शेतीत जास्त भर द्यावा असे आवाहन अजय देशपांडे यांनी केले. यावेळी अकोला येथील अभिषेक शर्मा ,हिंगणी येथील कृषी सहाय्यक महेश इंगळे ,शेतकरी सचिन कोरडे ,मंगेश कोरडे ,रितेश टीलावत ,आदी शेतकरी उपस्थित होते.