नागपूर : राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना मनि लॉंण्ड्रिग प्रकरणी इडीने अटक केल्यानंतर ते अद्यापदी इडीच्या कोठडीत आहे, राज्याच्या राजकारणातील सध्याच्या घडामोडी पाहता राजकारण ढवळून निघाले आहे. अशातच आता अमरावतीचे आमदार रवी राणा यांनीही मोठा दावा केला आहे. अमरावतीच्या यशोमती ठाकूर यांचा १२०० कोटींचा घोटाळा उघड करणार असल्याचा दावा केला आहे. इतकेच नव्हे तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणार, असल्याचाही भाकितही वर्तवल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. आमदार राणा दिल्लीत असताना त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला. या प्रकरणात ट्रान्झिट बेल मिळाली. त्यानंतर आमदार रवी राणा नागपूरमध्ये आले. नागपूर विमानतळावर पत्रकारांनी त्यांच्यावर प्रश्नांचा मारा केला असताना आमदार राणांनी राज्याविषयी महाविकास आघाडी सरकार आणि पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्यावर निशाणा साधला आहे. रवी राणा नेमकं काय म्हणाले? ‘महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात संजय राठोड यांना वनमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते अनिल देशमुख न्यायालयीन कोठडीत आहेत. आता नवाब मलिक हे देखील इडीच्या कोठडीत आहेत. त्यामुळे महाराष्ट्राला वाचवायचं असेल तर हे सरकार पाडावं लागेल. वेळ पडली तर राष्ट्रपती शासन लावावं लागेल. सध्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागेल अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. जे मंत्री घोटाळेबाज आहेत त्यांना तुरूंगात जाव लागणार, असं रवी राणा यांनी म्हटलं आहे.