नगर : जिल्ह्यातील लहान -मोठ्या नऊ धरणांत 19 हजार 523 दलघफू पाणीसाठा शिल्लक आहे. एकूण पाणीसाठ्याच्या तुलनेत 38.21टक्के पाणी उपलब्ध आहे. गेल्या वर्षी 17 हजार 688.33 दलघफू पाणीसाठा शिल्लक होता. यंदा पाऊस कमी असताना देखील धरणांत गेल्या वर्षीच्या तुलनेत 1 हजार 835 दलघफू पाणीसाठा अधिक आहे. दरम्यान, मुळा धरणात 129 दलघफूची आवक झाली. गेल्या चार वर्षांपासून जिल्हाभरात दमदार आणि सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद होत आहे. गेल्या वर्षी देखील सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला. जाता जाता सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यांत पाच दहा वेळा अतिवृष्टीची नोंद झाली. त्यातून पावसाची एकूण टक्केवारी 145 टक्के वर पोहोचली होती. त्यामुळे साहजिकच जिल्हाभरातील नऊ लहान -मोठी धरणे ओव्हरफ्लो झाली होती. यंदा मात्र पाऊस गुंगारा देताता दिसत आहे. रोहिणी आणि मृग नक्षत्र कोरडे गेले. आर्द्राने प्रारंभी सर्वदूर दमदार हजेरी लावत शेतकर्यांच्या आशा पल्लवीत केल्या. त्यानंतर पावसाने गुंगाराला दिला. शेवटच्या दिवसी या नक्षत्राने जिल्हा कमी अधिक प्रमाणात ओलाचिंब केला. त्यामुळे खरीप पेरणी दहा टक्क्यांच्या आसपास झालेली आहे. पावसाळा सुरु होऊन दीड महिना उलटला आहे. आतापर्यंत फक्त 90.5 मि.मी. पावसाची नोंद झाली. गेल्या वर्षी याच कालावधीत 132.2 मि.मी. पाऊस झाला होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 42 मि.मी. पाऊस कमी झाला आहे. अशा परिस्थितीतदेखील शनिवारी (दि.8) यंदा धरणांत गेल्या वर्षीच्या तुलनेत जवळपास दोन टीएमसी पाणीसाठा अधिक आहे. 18 जूनला भंडारदरा धरणात 5 हजार 697 तर निळवंडे धरणात 2 हजार 185 दलघफू असा दोन्ही धरणांत एकूण 7 हजार 882 दलघफू इतका पाणीसाठा होता. त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरु आहे. त्यामुळे भंडारदरात 6 हजार 530 तर निळवंडे धरणात 1 हजार 972 असा दोन्ही धरणांत 8 हजार 502 दलघफू इतका पाणीसाठा झाला. गेल्या 21 दिवसांत सरासरी 620 दलघफू पाणीसाठ्याची आवक झाली आहे.