मुंबई : महाराष्ट्रातील राजकारणात (Maharashtra Politics) गेल्या काही दिवसांपासून विविध घडामोडी घडत आहेत. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या गटाला शिवसेना आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह मिळाले आहे. त्यानंतर आज प्रथमच शिंदे गटाच्या शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यामध्ये एकनाथ शिंदेंची शिवसेनेच्या मुख्यनेतेपदी निवड करण्यात आली. याबाबतची माहिती कॅबिनेटमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी दिली. राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीनंतर सामंत यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. यामध्ये एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या मुख्यनेतेपदी सर्वानुमते निवड करण्यात आली. तसेच वि. दा. सावरकर यांना मरणोत्तर भारतरत्न मिळावा, यासाठी विचार झाला. तसेच पक्षाची नियमावली समोर ठेऊन काम केले जाईल. बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन आम्ही जाणार आहोत. तसेच शिस्तभंग समितीची स्थापनाही करण्यात आली आहे. यामध्ये दादा भुसे, शंभूराज देसाई यांचा समावेश आहे. यासह इतर अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले.
व्हीप बजावणार
एकनाथ शिंदे यांना शिवसेना पक्ष मिळाल्यानंतर विधिमंडळातील शिवसेनेच्या कार्यालयाचा ताबा शिंदे गटाच्या शिवसेनेनं घेतला आहे. यानंतर शिंदे गट शिवसेनेच्या सर्व 56 आमदारांना अधिवेशन काळात व्हीप बजावणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे ठाकरे गटातील 15 आमदार जर हजर न राहिल्यास त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई होऊ शकते, असे देखील म्हटले जात आहे. शिंदे गटाने ठाकरे गटाला कोंडीत पकडण्याची रणनीती शिंदे गट व भाजपने आखत असताना, शिंदे गट अधिक आक्रमक झाला आहे.