आरोपीस अटक
महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती,दि.2:-ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर क्षेत्रातील भानुसखिंडी नियतक्षेत्रातील संरक्षित वनात लागलेल्या आगीत २४ हेक्टर जागेतील जंगल जळून खाक झाले असून या घटनेला जबाबदार असणा-या आरोपीस वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी नुकतीच अटक केली आहे.प्राप्त माहितीनुसार, दि. ३० मे रोजी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर क्षेत्रातील ताडोबा वनपरिक्षेत्राचे अधिकारी व कर्मचारी गस्तीवर असताना भानुसखिंडी नियतक्षेत्रातील भानुसखिंडी संरक्षित वनात आग सुरू असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर सदर अधिकारी व कर्मचारी हे वेळीच घटनास्थळी पोहचले व त्यांनी आगीवर नियंत्रण मिळविले. त्यानंतर आग लावणा-या अज्ञात व्यक्तीचा शोध सुरू केला मौजा वायगाव ( भोयर ) येथील किसन सदाशिव जांभुळे (वय ५८ वर्षे )यांनी त्यांच्या अतिक्रमण केलेल्या शेतात धुरे / बांध जाळण्याकरीता आग लावल्याची माहिती मिळाली. आगीने रौद्र रूप धारण केल्याने त्यांच्या शेताला लागून असलेल्या भानुसखिंडी नियतक्षेत्रातील भानुसखिंडी संरक्षीत वनातील एकुण २४ हेक्टर जंगल जळाले.सदर आरोपी यांना शेतातील धुरे / बांध जाळत असताना संबधीत कर्मचारी यांना कळविण्याबाबत वनविभागाकडून दि. २२ मार्च रोजी एका पत्राद्वारे कळविण्यात आले होते. परंतु आरोपीने हेतुपरस्पर जंगलाला आग लावुन वन व वन्यजीवांचे आश्रयस्थान नष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे संबधीत आरोपी विरूध्द वन्यजीव ( संरक्षण ) अधिनियम १९७२ चे कलम ३० नुसार पि . ओ . आर . क्रमांक ० ९ ७५५ / २४३८५१ दिनांक ३१/०५/२०२२ अन्वये वनगुन्हा नोंदवुन सदर आरोपीस दि. ३१ मे रोजी अटक करण्यात आली. सदर घटनेची चौकशी ताडोबा वनपरिक्षेत्र अधिकारी सतीश शेंडे, सोनेगाव क्षेत्र सहाय्यक एस.एम.नन्नावरे, काटेझरी क्षेत्र सहाय्यक व्ही. डी. कामटकर व वनरक्षक पी.आर. कोसुरकर व इतर कर्मचारी यांनी केली.पुढील तपास सहाय्यक वनसंरक्षक खोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे .











