महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती : भद्रावती शहरापासून सुमारे ४० कि.मी.अंतरावर असलेल्या सीतारामपेठ या वनव्याप्त गावातील गुराख्याला पट्टेदार वाघाने हल्ला करुन जागीच ठार केल्याची घटना आज दि.३ फेब्रुवारी रोजी दुपारी ४.३० वाजता घडली. नमू धांडे (५०) असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या गुराख्याचे नाव असून तो सीतारामपेठ येथील ग्रामस्थ होता. नेहमी प्रमाणे त्याने आपली घरची गुरे गावापासून १ कि. मी. अंतरावर इरई धरणाकडे सरई रिसार्ट जवळ चरायला नेली. दरम्यान गुरे चारत असताना झुडुपात दबा धरुन बसलेल्या पट्टेदार वाघाने अचानक नमूवर हल्ला चढवून त्याला जागीच ठार केले. त्यानंतर त्याला इरई धरणाकडे फरफटत नेले. ही घटना जवळपासच्या लोकांना माहित होताच त्यांनी आरडाओरड केली असता नमूला सोडून वाघाने पळ काढला. या घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली. त्यानुसार वनविभागाचे अधिकारी व पोलिस घटनास्थळी दाखल झाले.त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी भद्रावती येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवला.दरम्यान, मृतक नमू धांडे हे ४ भाऊ होते. त्यापैकी त्याचे एक भाऊ गुजाबराव हे ४ वर्षांपूर्वी याच महिन्यात शिवरात्री च्या दिवशी सकाळी गावाबाहेर शौचास गेले असता त्यांच्यावर वाघाने हल्ला करुन त्यांनाही ठार केले होते. नमू याचा दुधाचा व्यवसाय होता. त्यासाठी त्याने गुरे पाळली होती. रोज तो गुरे चरायला न्यायचा. त्याच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि २ मुली आहेत. दरम्यान, सीताराम पेठ, कोंढेगांव व मुधोली परिसरात मागील एक महिन्यापासून वाघाची दहशत होती. याबाबत वाघाचा बंदोबस्त करण्याकरीता कोंढेगांव येथील सरपंच, ग्रामपंचायत कमिटी आणि ग्रामस्थ यांनी पालकमंत्री,खासदार, आमदार, जिल्हाधिकारी आणि वनविभागाला निवेदन सादर केले होते. तशा आशयाच्या बातम्या ही वृत्तपत्रात झळकल्या होत्या. आतातरी प्रशासनाने आजच्या घटनेची दखल घेऊन वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी सीताराम पेठ परिसरातील ग्रामस्थांकडून केली जात आहे.
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)