मुंबई : राज्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कडक निर्बंध लावण्याचे आदेश दिले आहेत.
आजच्या मध्यरात्रीपासून हे निर्बंध लागू करण्यात येणार आहेत. कार्यक्रमांसाठी एकत्र येणाऱ्या लोकांची संख्या आता ५० करण्यात आली आहे. ५०च्या वर जर लोकं एखाद्या कार्यक्रमाला जमा झाले तर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. अंत्यविधीसाठी फक्त २० लोकांचं बंधन घालण्यात आलं आहे. चौपाट्या, पर्यटन क्षेत्रे येथे गर्दी टाळण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आवश्यकता भासल्यास स्थानिक प्रशासनाने चौपाट्या, समुद्रकिनारे बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
सध्या काही मोजक्याच गोष्टींवर निर्बंध घातले गेले आहेत. सध्या जरी कमी निर्बंध लावले असते तरीसुद्धा या निर्बंधांमध्ये वाढ करण्याचा विचार राज्य सरकार गांभीर्याने करत आहे. यासंदर्भात गुरुवारी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत सविस्तर चर्चा झाली. यामध्ये शाळा, कॉलेज, मॉल्स, चित्रपटगृह यांच्यावरील संभाव्य निर्बंधांवर देखील खल झाला. तसेच, गंभीर परिस्थिती उद्भवल्यास लॉकडाऊनच्या पर्यायावर देखील चर्चा झाली.
शाळा बंद करण्यावरही चर्चा ?
अवघ्या काही दिवसांपूर्वीच राज्यात जवळपास दीड वर्षांनंतर शाळा पूर्ववत सुरु झाल्या होत्या. मात्र कोरोनाची वाढती संख्या पाहता आता शाळा बंद करण्याबाबतही चर्चा बैठकीत झाली आहे. लगेचच शाळा बंद करू नये असा सूर या बैठकीतला होता मात्र तरीही जर कोरोनाची रुग्णसंख्या आटोक्यात आली नाही तर मात्र शाळा बंद होतील अशी चर्चा बैठकीत झाली आहे.