महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती : ग्रामीण भागात लहान व युवा वर्गाच्या हातात संगणक व मोबाईल फिरत असल्याचे चित्र दिसून येत असून त्यामुळे ग्रामीण भागात पारंपारिक खेळ लोप पावत असल्याची खंत डॉ. अंकुश आगलावे यांनी व्यक्त केली.ते वरोरा येथे विवेकानंद ज्ञानपीठ कॉन्व्हेंट व तालुका क्रीडा संकुल यांच्या वतीने आयोजित खो-खो सामन्याच्या उद्घाटन सोहळया प्रसंगी बोलत होते.डॉ. आगलावे पुढे म्हणाले की, विविधतेने नटलेल्या भारतीय संस्कृतीत कला, क्रीडा, धार्मिक-अध्यात्मिकतेसोबत ग्रामीण खेळांनाही मोठे महत्व दिले जाते. मात्र दिवसेंदिवस खेळ बदलत जात असून लोप पावत असल्याचे दिसून येत आहे. तसेच देशाचे भविष्य हे विद्यार्थ्यांच्या हातात असून खेळाच्या माध्यमातून भविष्य घडविता येते. देश भारतीय घटनेमुळे, तर गावांचा कारभार ग्रामगीता व्दारे चालतो. तसेच संतांनी समाज जनजागृती करून समाज व्यसनमुक्त करण्याचा प्रयत्न केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिका, संगठीत व्हा व संघर्ष करा असे सांगितले. त्यामुळे समाजातील गरीब घटकांतील वर्गानी आपले अस्तित्व निर्माण करून प्रत्येक क्षेत्रात आपला पाय खंबीरपणे रोवला पाहिजे असेही ते याप्रसंगी म्हणाले. यावेळी कार्यक्रमाला आ. प्रतिभाताई धानोरकर उद्घाटक म्हणून उपस्थित होत्या. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी विधानसभा उपाध्यक्ष ॲड. मोरेश्वर टेमुर्डे उपस्थित होते.तर प्रमुख अतिथी म्हणून माजी नगराध्यक्ष अहेतेशाम अली, जिल्हा शिवसेना प्रमुख मुकेश जीवतोडे, माजी सभापती राजू चिकटे, माजी न.प.उपाध्यक्ष अनिल झोटींग, सी.डी.सी.सी.बॅंकेचे संचालक रवींद्र शिंदे, शेगांव (बु.) ग्राम पंचायतीचे सरपंच सिद्धार्थ पाटील, तहसीलदार रोशन मकवाने, ठाणेदार दीपक खोब्रागडे, तालुका क्रीडा अधिकारी विजय ढोबाळे, खो-खो फेडरेशन चंद्रपूरचे सचिव मोरे, विदर्भ खो-खो फेडरेशन सचिव सुधीर निंबाळकर, आनंदवन येथील क्रीडा शिक्षक तानाजी वायस्कर, सागर कोहळे ,रवी चरूरकर, धनराज रेवतकर उपस्थित होते.


