मुंबई : राज्यात करोना संसर्गासोबतच ओमायक्रॉनच्या रुग्णसंख्येतही दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. त्यातच राज्यातील शाळा आणि महाविद्यालयांच्या बाबतीत राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी मोठे विधान केले आहे.
‘करोना संसर्ग पुन्हा वाढीस लागल्याने शाळा महाविद्यालयाबाबत परिस्थती पाहून लवकरच निर्णय घेतला जाईल.’, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
मुंबई विद्यापीठाच्या वार्षिक दीक्षांत समारंभावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे प्रतिपादन केले. तसेच, ‘सद्यस्थिती गंभीर नसली तरी करोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे प्रत्येकानेच काळजी घ्यायला हवी. गर्दी टाळणे आणि मास्कचा वापर प्रत्येकासाठी अनिवार्य आहे.
सध्या नाताळ निमित्त शाळा महाविद्यालयांना सुट्ट्या आहेत. मात्र पुढील काळात शाळा , महाविद्यालये सुरू ठेवायचे की नाही? याचा निर्णय परिस्थिती पाहून घेतला जाईल.’, असेही ते म्हणाले. मुंबई विद्यापीठाच्या वार्षिक दीक्षांत समारंभात सन्माननीय उपस्थिती म्हणून त्यांनी हजेरी लावली होती.
काही मुलांनी दोन वर्षात शाळा पाहिलेलीच नाही अशी स्थिती आहे, याबद्दल निश्चितच दुःख आहे पण आरोग्य ही आपली प्राथमिक गरज असल्याने काही निर्णय घ्यावे लागतात. हा आठवडा गेल्यावर परिस्थितीचा आढावा घेऊन शाळा, महाविद्यालयांच्या बाबतीत निर्णय घेतला जाईल, असे प्रतिपादन यावेळी मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले.