अवैद्य वाळू तस्करांकडे प्रशासकीय यंत्रणेचे सोयीस्कर दुर्लक्ष
शेख तालीब
ग्रामीण प्रतिनिधि दानापुर
दानापुर (वा):- तालुक्याची वान नदी जीवनवाहिनी आहे. मात्र अवैध वाळू उत्खननामूळे या नदीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. गेल्या अनेक वर्षापासून वाळू माफिया वान नदीत अवैधरित्या उत्खनन करून वाळूची तस्करी करीत आहेत. मात्र महसूल विभागाने या गंभीर प्रकाराकडे सोयीस्कर दुर्लक्ष करीत डोळे असून आंधळे पणाचा सोंग घेतल्याने वाळू माफियांना अभय मिळाले आहे. परिणामी नदीपात्राच्या विविध वाळू घाटातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उत्खनन करून दिवसाढवळ्या वाहतूक सूरू असल्याने वान नदीचे अस्तित्व धोक्यात आले. हा गोरखधंदा रोखण्यात महसूल प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरले आहे. स्थानिक अधिकारी व कर्मचाऱ्यांसोबत हातमिळवणी करीत वाळू माफियांकडून अवैध उपसा केला जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून होत आहे. नदीपात्रात सर्रास जेसीबी, मशीनच्या साहाय्याने वाळू उत्खनन केले जात आहे. अवैध वाळूची टीपर ट्रॅक्टर अशा विविध वाहनांच्या साहाय्याने वाहतूक सूरू आहे. वान नदी पात्रातिल अनेक रेती घाट गेल्या अनेक वर्षांपासून वाळू माफियांचा अड्डा बनले आहे. एकीकडे तालुक्यात वाळूने भरून सुसाट धावणाऱ्या वाहनांमूळे अपघात होऊन निष्पाप नागरिकांचे बळी जात आहेत. तर बऱ्याच नागरिकांना कायमचे अपंगत्वालाही सामोरे जावे लागले आहे. वेळोवेळी अवैध वाळू तस्करी विरुद्ध नागरिकांनी आवाज उठविला. मात्र, अधिकार्यांनी याकडे दुर्लक्ष करीत वाळू माफियांना अभय दिला. तसेच, वाळू वाहतूक करणार्या वाहनांमुळे विविध रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. स्थानिक कर्मचार्यांना हाताशी धरून प्रशासकीय अधिकार्यांच्या डोळ्यामध्ये धूळफेक केली जात आहे. ते तेल्हारा तालुक्यातील वाळू माफियांनी सूध्दा वान नदी पात्रात हैदोस घातला आहे. नदीपात्रातून वाळूच्या सर्रास चोरीने शासनाचा लाखोंचा महसूल बुडत आहे. त्यामुळे अवैद्य वाळू उपसा व वाहतुकीवर अंकुश लावणे गरजेचे झाले आहे.
चौकट:-
१) भरारी पथके कागदावर
क्षेत्रातील वाळू घाटावर होत असलेल्या हालचालीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी तालुका व ग्रामस्तरावरील समित्या सुद्धा कागदावर आहेत. तेल्हारा तालुक्यात दक्षता समित्या तसेच भरारी पथके नाममात्र असून यांच्या कडून एकही भरीव कारवाई करण्यात येत नाही.
२) अर्थचक्राचा मार्ग जूळवत अवैध वाळू वाहतूक
तेल्हारा तालुक्याची शान असलेली सातपुडा कन्या ‘वान’नदी मधुन सर्रास अवैध उत्खनन सुरुच असुन नदीपात्रात जागोजागी मोठमोठे जिवघेणे खड्डे माफीयांनी करुन ठेवले आहेत. तसेच अत्यंत दुर्गम अशा आदिवासी भागातील विविध नदीपात्रातील शिवारातून अवैद्य वाळू उत्खनन वाहतूक सुरू आहे. अर्थचक्राचा मार्ग जूळवत नदीपात्रांतून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा केला जात आहे. अवैद्य वाळू वाहतूक करणाऱ्यांना कोणाचीच भिती नसल्याने हा गोरखधंदा राजरोसपणे सूरू आहे.
३) या ‘पुष्पां’ना आवर घालने गरजेचे
‘पुष्पा’ चित्रपट मधील चंदन चोरांनाही लाजवेल अशी वाळूमाफियांची दहशत ग्रामीण भाग अनुभवतो आहे. नको त्या ठिकाणी मार्गाने वाळू उपसा व वाहतूक सूरू आहे. प्रयत्ने कण रगडिता वाळूचे तेलही गळे’ या कवितेला वाळू माफियांनी आजवर उलटे टांगले आहे. कारण वाळूचे धोरण हे सांगते की कुठलेही कष्ट करण्याऐवजी वाममार्गाने दांडगाई करा आणि वाळूतून पैसे कमवा. या धंद्याला अभय देण्यात काही अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सक्रिय सहभाग असल्याचा आरोप आहे


