गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
गाडेगाववरून तुदगांवला जाण्यासाठी असणाऱ्या ग्राम रस्त्यामध्ये झालेल्या अवैध उत्खननाची चौकशी होऊन दोषींवर कार्यवाहीची मागणी गाडेगावचे ग्रामस्थ व शेतकरी यांनी तेल्हाराचे तहसीलदार डॉ.संतोष येवलीकर यांच्याकडे तक्रार अर्जाद्वारे केली आहे. गाडेगाव -तुदगाव हा ग्राम रस्ता इंग्रज काळापासून अस्तित्वात आहे. इ.स.1928 मध्ये इंग्रजांनी तयार केलेल्या महसुली नकाशामध्ये तशी अधिकृत नोंद आहे. तुदगावला जाण्यासाठी गाडेगाव चे ग्रामस्थ याच रस्त्याचा वापर करतात.या परिसरातील शेतकरी शेतीची वहीती सुद्धा याच रस्त्यावरून करतात.मात्र तेल्हारा येथील उद्योजक अनिल छगनलाल अग्रवाल व विनोद छगनलाल अग्रवाल यांनी जेसीबी द्वारे या रस्त्यामध्ये मातीचे 100 फूट लांब अवैध उत्खनन करून सर्वे नंबर 54 मध्ये मातीचा बांध घातला. या उत्खननामुळे शेतकऱ्यांच्या शेताच्या वहितीस व ग्रामस्थांना जाण्यायेण्यास अडथडा निर्माण झाला.पावसाळ्यामध्ये या रस्त्यात पावसाचे पाणी साचून शेतीची वहिती करणे कठीण होऊन जाईल. त्यामुळे या अवैध उत्खननाची चौकशी व योग्य कार्यवाही व्हावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. तक्रार अर्जावर उत्तम नळकांडे,किसन उजाड, शेख बब्बू ,शेख इस्माईल, सुनील कोरडे , अनिल रूपराव वानखडे , गिरीश देशमुख,किसन खंडेराव, राजेंद्र काळे, प्रकाश नळकांडे, वासुदेव कोरडे, सुभाष लासुरकार, केशवराव ताथोड , विजय बोर्डे, लक्ष्मण काळे, संजय वडतकार, शारदा हिंगणकार, हरिदास चुंगळे व अन्य शेतकरी,ग्रामस्थांच्या सह्या आहेत.या प्रकरणाच्या चौकशीकडे गाडेगाव ग्रामस्थांचे लक्ष लागून राहिले आहे.