आमिर खानचा ‘लाल सिंग चड्ढा’ तर अक्षय कुमारचा ‘रक्षाबंधन’ चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित झाले. पण या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांचा अपेक्षेपेक्षा फार कमी प्रतिसाद मिळाला. बॉक्स ऑफिसवर तर बिग स्टार्सचे हे चित्रपट चांगलेच आपटले. ‘लाल सिंग चड्ढा’, ‘रक्षाबंधन’ चित्रपटांची प्रदर्शनापूर्वीच नकारात्मक चर्चा रंगली. यामुळे चित्रपटांचं आर्थिक गणितही बिघडलं. आता दोन्ही चित्रपटांना कोट्यावधी रुपयांचं नुकसान सहन करावं लागत असल्याची चर्चा आहे. बॉलिवूड हंगामाच्या वृत्तानुसार, प्रदर्शनाच्या पहिल्याच आठवड्यामध्ये ‘लाल सिंग चड्ढा’ने बॉक्सऑफिसवर ५० कोटी रुपयांचा टप्पा देखील पार केला नाही. पहिल्या आठवड्यात या चित्रपटाने फक्त ४९ कोटी ६३ लाख रुपये इतपत कमाई केली. १८० कोटी रुपये बजेट असलेल्या ‘लाल सिंग चड्ढा’चं मोठं आर्थिक नुकसान झालं असल्याची चर्चा आहे. चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन पाहता ‘लाल सिंग चड्ढा’चं १०० कोटी रुपयांचं नुकसान झालं असल्याचं बोललं जात आहे. ‘बॉयकॉट लाल सिंग चड्ढा’ या ट्रेंडमुळे चित्रपटाला सर्वाधिक नुकसान झालं का? असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे. आमिरने मात्र सतत होणाऱ्या या चर्चांबाबत मौन पाळणंच पसंत केलं आहे. तर दुसरीकडे अक्षय कुमारच्या ‘रक्षाबंधन’ चित्रपटाचीही तिच परिस्थिती आहे. या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या आठवड्यामध्ये फक्त ३७ कोटी ३० लाख रुपये कमाई केली आहे. तसेच प्रदर्शनाच्या सातव्य दिवशी फक्त १ कोटी २५ लाख रुपये कमावले. यावर्षीच्या सर्वाधिक सुपरफ्लॉप चित्रपटांच्या यादीमध्ये ‘रक्षाबंधन’चा समावेश झाला आहे.


